30 मार्च रोजी होणार सुनावणी ,
अब्दुल कय्युम
औरंगाबाद : पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्हयात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. राजकीय हेतुने प्रेरीत होऊन सदर तक्रार देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी क्रांतीचौक पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या घटनेशी संबंध नसल्याचा दावा जाधव यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. न्या. मंगेश एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली असता प्रतिवाद्यांना नोटीस बजाविण्यात आली. ३० मार्च रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे (वय ३०, रा. बनेवाडी) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, दाभाडे यांनी जिल्हा न्यायालयासमोरील सिग्नलजवळ पानटपरी सुरु केली व तिथे निळा झेंडा लावला. २९ पेâब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी हर्षवर्धन जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार नितीन दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिली होती. दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जाधव यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटणंगणकर यांनी ९ मार्च २०२० रोजी फेटाळला होता. त्यानंतर जाधव यांनी अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. अॅड. अभयसिंह भोसले यांनी जाधव यांची बाजू मांडली