नगराध्यक्षा सौ.गोरंटयाल यांचा कौतुकास्पद निर्णय
लक्ष्मण बिलोरे
जालना / मराठवाडा – नगराध्यक्षा पदासाठी दिल्या जाणाऱ्या मानधनातून मिळालेल्या एक लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी आज गुरुवारी आमदार श्री कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला आहे.जालना शहर व जिल्ह्यातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा,राजकीय अशा जवळपास सर्वच क्षेत्रात गोरंटयाल परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे.
स्व.किसनराव गोरंटयाल,माजी नगराध्यक्ष स्व.व्यंकटेश गोरंटयाल,स्व.भुदेवी गोरंटयाल यांनी सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेऊन सर्वधर्मीय लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.व्यंकटेशजी गोरंटयाल हे जालना पालिकेचे नगराध्यक्षा असतांना त्याकाळात त्यांना राज्य शासनाकडून प्रतिमहा 500 रुपये मानधन मिळत होते. त्यावेळी त्यांनी देखील सदर रक्कम स्वतः किंवा कुटुंबासाठी न वापरता या मानधनातुन मिळणारी सर्व रक्कम शाळा,सामाजिक संस्था, आणि गरजूंना वाटप केली होती. व्यंकटेशजी गोरंटयाल यांची ही परंपरा तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान आ.कैलास गोरंटयाल यांनी जोपासली.नगराध्यक्ष असतांना राज्य शासनाकडून या पदासाठी दिल्या जाणारी मासिक मानधनाची रक्कम शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी वापरली होती.आणि आता कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे गोरगरीब मजुर, कामगार आर्थिक संकट आणि अन्न धान्य अभावी हतबल झालेल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी आ.कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल हे दाम्पत्य पुढे आले.शहरातील 25 हजार पेक्षा अधिक गोरगरीब कुटुंबाला अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून गरजूंना अडचणीच्या काळात मोठा आधार दिला.एवढेच नाही तर मातोश्री स्व.भुदेवी किसनराव गोरंटयाल यांच्या नांवाने अन्नछत्र सुरू करून या अन्न छत्राच्या माध्यमातून दररोज तीन ते चार हजार लोकांना पोळी भाजी, पुरी भाजी,पुलाव खिचडी असे फूड पाकीट तयार करून जालना शहरातील विविध भागांतील गरजूंची भूक भागविण्याचा अत्यंत कोतुकास्पद उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविला.जालन्याच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी देखील सामाजिक भान राखून आणि गोरंटयाल परिवाराच्या सामाजिक कार्याचा वारसा कायम ठेवला आहे. नगराध्यक्ष पदासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मासिक मानधनाच्या रक्कमेतून एक लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी आज गुरुवारी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला आहे.यावेळी राम सावंत,रमेश गौरक्षक, संजय भगत आदींची उपस्थिती होती. दरम्यान, राज्य शासनाकडे सतत वेगवेगळ्या मागण्या करून निधीची मागणी करणारे लोकप्रतिनिधी आपण आतापर्यंत पाहिले आहेत मात्र एखाद्या पदासाठी राज्य शासनाकडून मिळणारी मानधनाची थोडी थोडकी नव्हे तर एक लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ करून नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.