कर्जत – जयेश जाधव
अनेक बलाढ्य देशांनाही हादरवून सोडणारा हा कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला आहे. मृतांचे आकडे रोज वाढताना दिसत आहेत सर्वत्र एकच हतबलता आणि असमर्थता भरून राहिली आहे.अशा या गंभीर स्थितीत मानवतेच्या भावनेतून सर्वजण एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतानाही दिसत आहेत. मात्र खेडोपाडी दूर डोंगरांमध्ये राहणारे या मदती पासून वंचीत राहत आहेत. सरकार सर्वतोपरी आणि सर्वांसाठी मदत देऊ करत आहे मात्र परिस्थितीच अशी आहे की मदत मिळेपर्यंत त्यांची उपासमार होऊ शकते.
अशा परिस्थितीत सर्व आघाड्यांवर लढणारे डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या बरोबरीने काही सामाजिक संस्था खंबीरपणे उभे राहताना दिसत आहेत तर अनेक दानशूर लोक या संकटाच्या वेळी गरीबांना मदतीचा हात देत आहे .
अशीच एक सामाजिक संस्था कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बेडीसगाव व वांगणी परिसरातील आदिवासी बांधवांसाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे ती म्हणजे साद फाऊंडेशन. साद फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी भागात धान्यवाटप केले.
बेडीस गाव वांगणी येथील आदिवासी पाड्यावर साद परिवारा कडून धान्य पुरविण्यात आले.
रोजंदारीवर पोट असणारे आदिवासी बांधव यांची अवस्था खरच फार बिकट आहे. शेतात फक्त तांदूळ पिकला पण त्याबरोबर खायला काहीतरी हवेच ना. डाळ तेल तिखट मीठ सर्व काही लागते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लॉक डाऊनमुळे या बांधवांचा रोजगार बुडाला त्यामुळे त्यांच्याजवळ ना पैसे ना सामान आणायला जायला वाहन ना कसली सुविधा.
सरकारने आपल्या परीने खूपच योजना जाहीर केल्या आहेत पण त्या त्यांच्यपर्यंत पोहोचायला अजून कितीतरी दिवस लागतील.
तोपर्यंत कसे जगायचे या प्रश्नाने त्रस्त असणाऱ्या बांधवांची व्यथा साद फाउंडेशनचे प्रदीप कुळकर्णी आणि प्रीती कुलकर्णी यांनी जाणली. आणि एका संपूर्ण वाडीला पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. 180 कुटुंबातील घरापर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात दिला.
बेडीस गावातील 2 वाड्या उंच डोंगरात आहेत तिथे ना वाहन जात ना कसली सोय त्या बांधवानादेखील जास्तीत जास्त मदत कशी पोहचवता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. या शिवाय करोना आजाराविषयीची जनजागृती केली वारंवार हात धुण्याचे महत्व, सर्दी खोकला झाल्यास काय करावे, सोशल डिस्टन्स कसे पाळावे, आरोग्यदायी सवयी कशा अंगी बाणवाव्यात यावर मार्गदर्शनही केले.
आजाराला घाबरू नका तर आजार आपल्यापर्यंत पोहोचूच नये यासाठी खबरदारी घ्या असे आवाहन त्यांनी प्रत्येक वाडीतील बांधवाला केले.
धान्य वाटप करताना सर्व सरकारी नियमांचे आरोग्यदायी सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि सामाजिक बांधिलकी जपण्यास आपल्यापरीने हातभार लावला.