Home रायगड सत्य बातमी छापल्याप्रकरणी रायगड टाईम्सच्या संपादकांवर गुन्हा दाखल

सत्य बातमी छापल्याप्रकरणी रायगड टाईम्सच्या संपादकांवर गुन्हा दाखल

118

अलिबाग – भूमिपुत्रांना डावलणारी कंपनी म्हणजे जेएसडब्ल्यू अशी रायगडमध्ये या कंपनीची ओळख आहे.दिवस-रात्र धुरांडी हवेत सोडून रायगडचे पर्यावरण खराब करणारी कंपनी. प्रदुषणामुळे डोळे फुटायची आणि उग्र वासामुळे नाकातील केस जळायची वेळ या कंपनीने आणली आहे. प्रशासन आणि काही नेत्यांना खिशात घेऊन फिरणार्‍या या कंपनीच्या बुडातून ‘रायगड टाइम्स’ने धूर काढला.

याचाच राग मनात धरून जेएसडब्ल्यू कंपनीने ‘रायगड टाइम्स’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. खोटी बातमी दिल्याची तक्रार कंपनीने पोलिसात दिली आहे. सोशल मीडियात अशाप्रकारे तक्रार केल्याची प्रत व्हायरल होत आहे.अशी तक्रार दाखल करुन घेणार्‍या पोलिसांच्या तत्परतेला सलाम करायला हवा.

जेएसडब्ल्यूच्या विरोधात ‘रायगड टाइम्स’ने आवाज उठवला आहेच; परंतु स्थानिक जनतेमधूनही प्रंचड रोष निर्माण होवू लागला आहे.याची दखल घेत अलिबागमधील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी रायगडचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जनतेच्या भावना सांगितल्या. कंपनीने मात्र इथे आपल्या मुजोरी आणि दबाव तंत्राचा अवलंब केला. जनतेची भाषा बोलणार्‍या ‘रायगड टाइम्स’वरच एफआयआर दाखल झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला.

सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलत राज्यभर पत्रकारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.या मालिकेत अलिबाग येथील रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हयातील जेएसडब्लू कंपनीत सहा कामगारांना कोरंन्टाईन केल्याची बातमी रायगड टाइम्सने दिली होती.

शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही बातमी दिलेली असली तरी अफवा पसरविलयाचे कारण देत कंपनीने पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता गुन्हा ही दाखल केला आहे.सत्य बातमी दिल्यामुळे पत्रकारावर गुन्हे दाखल होणार असतील तर कोरोनाच्या बातम्याच द्यायच्या नाहीत का? एकीकडे पंतप्रधान माध्यमांचं कौतूक करीत असताना पोलीस मात्र पत्रकारांशी आकसाने वागत त्यांना मारहाण करीत आहेत.. खोटे गुन्हे दाखल करीत आहेत.

खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल केली आणि पत्रकाराची बदनामी केली म्हणून आता रायगडचे पत्रकार कंपनीच्या विरोधात तक़ार देण्याच्या तयारीत आहेत.