
अमीन शाह
नागपूरच्या धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे, ज्यामुळे संपूर्ण शेती जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रयोगात त्यांनी सेंद्रिय पद्धतीने असे कांदा उत्पादन केले आहे, ज्याचे वजन तब्बल ८०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत भरले आहे. एक सामान्य कांद्याचे सरासरी वजन १०० ते १५० ग्रॅम असते, त्यामुळे हा प्रयोग अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायक ठरतो
कांचन गडकरी यांनी हा प्रयोग करताना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला असून, विशेषतः नेदरलँडमधून आयात केलेल्या उच्च दर्जाच्या बिया वापरण्यात आल्या. या बिया ‘सेमिनीस’ या नामवंत कंपनीच्या होत्या आणि त्यांचे प्रमाण फक्त अडीच किलो इतकेच होते. या बियांची लागवड एका एकर जमीन क्षेत्रावर केली गेली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, जिथे रोपे काळजीपूर्वक वाढवण्यात आली आणि त्यानंतर ती शेतीत हलवण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेत अनेक अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. डबल ड्रिप इरिगेशन सिस्टम वापरून पाण्याचा योग्य आणि माफक वापर करण्यात आला. मातीमध्ये बायो ऑर्गॅनिक खत मिसळण्यात आले, जेणेकरून पोषणतत्त्वांची कमतरता भासू नये. त्यानंतर बेडवर मल्चिंग पेपर अंथरला गेला आणि त्या मल्चिंगमध्ये होल करून कांद्याची रोपे लावण्यात आली. ही एक अत्याधुनिक आणि शाश्वत शेतीची पद्धत मानली जाते.









































