Home पश्चिम महाराष्ट्र छळाला कंटाळून महिलांची आत्महत्या

छळाला कंटाळून महिलांची आत्महत्या

119

हुंड्यापायी विवाहित महिलांना देण्यात येणाऱ्या मानसिक व शारीरिक छळात वाढ

सुशांत आगे / पुणे
कोमल आणि रूपेश यांचा जून २०१९ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर रूपेश आणि त्याच्या नातेवाइकांनी कोमलला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. हुंड्यापायी मानसिक आणि शारीरिक छळाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

‘हुंडा प्रतिबंधक अधिनियम १०६१ चा कायदा लागू होऊन साठ वर्षे झाली तरी एकविसाव्या शतकातही विवाहितांच्या मानसिक आणि शारीरिक छळांच्या घटना कमी झालेल्या नाहीत. माहेरहून विविध गोष्टी आणण्याचा तगादा लावत विवाहित महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आगस्ट महिनाअखेर विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधी १८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुलैमध्ये हेच प्रमाण १६१ इतके होते.

लग्नाच्या वेळी मुलीसह तिच्या सासरकडच्या मंडळींना आपणहून काही गोष्टी देण्याची रीत आहे. त्यात मुलीसाठीचे प्रेम सामावलेले असल्याने अनेक महागड्या वस्तूही तिच्या सासरकडच्या मंडळींना दिल्या जातात. मात्र कित्येकदा हीच गोष्ट सासरकडच्या मंडळींच्या डोळ्यांवर येते आणि सून लग्न करून सासरी आली की माहेरहून नवीन व्यवसाय करण्यासाठी पैसे आण, चारचाकीच हवी…अशा एक ना एक असंख्य मागण्या वाढायला लागतात. सततच्या सासरकडच्यांच्या मागण्यांमुळे असंख्य विवाहितांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये उच्चशिक्षित महिलादेखील मागे नाहीत. या घटनांनी समाजही सुन्न झाला पण सासरकडील मंडळीच्या डोळ्यांत अंजन पडले नाही. कायदा होऊन साठ वर्षाचा कालावधी उलटला तरी इंडाबळीचे सत्र थांबलेले नाही. गतवर्षी विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधी १५६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

[[हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रोव्हिजन अधिकाऱ्यांची नेमणूक केलीये का?
त्यांना काही अधिकार दिले आहेत का? मुख्य म्हणजे हुंडा या संकल्पनेला एक समाजमान्यता मिळाल्यासारखे आहे. लग्नाच्या वेळी देवाणघेवाण केली जाते. एक प्रकारे बाजारव्यवस्थेचा प्रभाव असल्यासारखे आपण तिचे सुख विकत घेऊ शकतो. सध्या हुंड्याचे स्वरूप बदलले आहे. खर्चिक लग्न त्यातून लग्नाला प्रतिष्ठेचे स्वरूप आले आहे. हे सर्व मोडून काढायला हवे तर बदल घडतील. यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यायची गरज आहे.
-किरण मोघे,
अखिल भारतीय महिला जनवादी संघटना]]

[[हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम १९६१

■ कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणान्यास ५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा.

■ हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी ६ महिनेपर्यंतची कैद आणि १० हजार दंडाची शिक्षा आहे. जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणाअगोदर तिला हुंड्यासाठी प्रवृत केले जात होते.

■ भारतीय दंड संहिताच्या कलम ३०४ बीच्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी ७ वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.]]