Home महाराष्ट्र विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध – आमदार हितेंद्र ठाकूर

विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध – आमदार हितेंद्र ठाकूर

215

प्रतिनिधी – विरार

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने वसई-विरार पट्ट्यालाही सोडलं नसून तिथेही कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. सध्या कोरोनावर इलाज शोधण्यासाठी आणि अधिकाधिक रुग्णांना सामावून घेणारी वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना विरारमधील विष्णु वामन ठाकूर धर्मादाय संस्था पुढे सरसावली आहे. विरारमधील विवा महाविद्यालयाच्या दोन इमारतींसह शिरगाव येथील संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारतीही वैद्यकीय कारणासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी या ट्रस्टने दाखवली आहे. तब्बल ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या महाविद्यालयांत वसई-विरार शहरातील हजारो रुग्णांची सोय सहज शक्य होणार आहे. तशा आशयाचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. विरार येथील विवा महाविद्यालयात ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयाचा विस्तार खूपच मोठा आहे. सध्या कोरोनाचे थैमान आवरण्यासाठी वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याचे समोर येत आहे. नेमका हाच विचार करून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने आपल्या महाविद्यालयाच्या इमारती वैद्यकीय वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विरारमधील दोन आणि शिरगावमधील महाविद्यालयाच्या इमारती रिकामी आहेत. वैद्यकीय कारणासाठी ही वास्तू सत्कारणी लागणार असेल, तर त्याचे सर्वात जास्त समाधान आम्हाला वाटेल. नेमक्या याच उद्देशाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. सध्या आरोग्यसुविधांबरोबरच अन्नधान्याची सोय हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत आहे. याचाच विचार करून श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अशा काही संस्था आणि समाजातील दानशूर लोक यांनी एकत्र येत जवळपास १५ हजार लोकांच्या जेवणाची मोफत सोय केली आहे.

महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केल्यास तेथील रुग्णालय कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणा-खाण्याची सोयही विनामूल्य केली जाईल, असंही ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे. कोरोना महामारी हे जगावरील आणि मानवजातीवरील मोठं संकट आहे. या संकटाच्या काळात एकत्र येऊन लढा देणं आवश्यक आहे. नेमका हाच विचार करून आम्ही आमच्या परीने खारीचा वाटा उचलत आहोत, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.