Home मराठवाडा मी देवा घरी जात आहे तुझ्या माय चा ध्यान ठेव ????

मी देवा घरी जात आहे तुझ्या माय चा ध्यान ठेव ????

539

मुलीस चिट्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या….!

नजाकत सययद

जालना , दि. ०५ :- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबताना दिसत नाहीत. कर्जबाजारीपणाचा कंटाळा आल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ‘आईला जीव लाव. मी देवा घरी चाललो,’ असं चिठ्ठीतून शाळेत जाणाऱ्या लेकीला सांगत या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेमुळे जालन्यातील भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गजानन पुंजाजी वाघ असं या ३६ वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते भोकरदन तालुक्यातील वरूड (बु) येथे राहतात. वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्यावर महिंद्रा फायनान्स कंपनीचे दीड लाखाचे तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. सरकारने कर्जमाफीच्या दोन याद्या जाहीर केल्या. त्यात वाघ यांचं नाव आलं नव्हतं. त्यामुळे वाघ अस्वस्थ होते. कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न समोर उभा राहिल्याने तणावात असलेल्या वाघ यांनी टोकाचं पावलं उचलत जीवन संपवलं.
वाघ हे पत्नी आणि आईसोबत शेतात गेले नाही. एक काम आटोपून नंतर शेतात येतो असं सांगून त्यांनी पत्नी आणि आईला शेतात पाठवलं. त्यानंतर मुलीलाही शाळेत जाऊ दिलं आणि त्यानंतर त्यांनी घरात स्वत:ला कोंडून घेऊन गळफास घेतला. बराच आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने मुलीने आणि आजीने शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता, वाघ यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलीच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘माझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला, तुमच्या गरजा, आईचे स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. यामुळे मी पूर्णपणे खचलो आहे, आता आईला जीव लाव मी देवा घरी चाललो’, असं त्यांनी मुलीला उद्देशून चिठ्ठीत लिहिलं आहे. पोलिसांनी ही चिठ्ठीही ताब्यात घेतली असून अधिक तपास करत आहेत.