Home बुलडाणा समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे – निरंजन भाकरे

समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे – निरंजन भाकरे

261

रवि आण्णा जाधव

देऊळगावराजा , दि. ०५ :- आज समाजामध्ये परिवर्तनाची गरज आहे. जुन्या चालीरीतींना बगल देत समाजासाठी काहीतरी करावे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देवानंद कायंदे यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर तेरवीचा कार्यक्रम रद्द करून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेतला. माझ्यासारख्या माणसाला बोलावून जनजागृती करण्याचे काम या भारुडाच्या माध्यमातून भाऊंनी केले. यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. असे आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम भारूडकार निरंजन भाकरे यांनी उंबरखेड येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद कायंदे यांच्या आई कै. शांताबाई खंडुजी कायदे यांचे निधन झाले. भाऊंनी परंपरागत चालीरीतींना फाटा देत सामाजिक जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. रक्षाविसर्जनाला त्यांनी रक्षाचे विसर्जन न करता, या रक्षेचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी केला . दहाव्याचा खर्च न करता उंबरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५० हजाराचे फिक्स डिपॉझिट करून दिले. या डिपॉझिट रकमेच्या व्याजामधून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. आईच्या तेरवीनिमित्त देवानंद भाऊ यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम भारूडकार निरंजन भाकरे यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला. ऊंबरखेड येथे आयोजित कार्यक्रमात निरंजन भाकरे यांनी भाऊच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीताबद्दल निरंजन भाकरे यांनी जागृती केली. आपल्या भारुडामधून त्यांनी “मुलींना वाचवा, मुली जगवा”, “महिलांचे संरक्षण करा”, “झाडे लावा, झाडे जगवा”, “पाणी आडवा पाणी जिरवा”, “अंधश्रद्धा पाळू नका”, “आपल्या गावाचा विकास करा”, “मुलांना शिक्षण द्या”, “गाव हागणदारी मुक्त करा”, “समाज व्यसनमुक्त करा” आदी विषयांवर आपल्या भारुडमधून त्यांनी प्रबोधन केले. त्यांचे सुप्रसिद्ध भारुड “बुरगुंडा होईल तुला बाई”हे भारुड त्यांनी सादर केले.यावेळी ग्रामीण भागातील लोकांची उपस्थिती लक्षानिय होती. निरंजन भाकरे यांनी पाटोदा धर्तीवर आपल्या उंदरखेड गावाचा विकास करा असे भावनिक आवाहन केले.यावेळी देवानंद कायंदे ,नंदाताई कायंदे, मनोज कायंदे, सतिष कायंदे, व कायंदे परिवारा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन उंबरखेड येथे करणात आले होते.राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.