
(अयनुद्दीन सोलंकी)
———————–
घाटंजी :- महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे पुनर्गठन करण्यात आले असून वन्यजीव मंडळावर सदस्यपदी आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या या मंडळाचे उपाध्यक्ष वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यपदी यवतमाळ जिल्ह्यातून पहिल्यांंदाच नियुक्ती झाली आहे, हे येथे उल्लेखनीय.
महाराष्ट्र वन्यजीव मंडळात एकूण 31 सदस्य असून त्यात संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ तीन आमदारांचा समावेश आहे. त्यात आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार समीर मेघे व आमदार आशिष जयस्वाल हे आमदार असून तिघेही विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतात, हे विशेष. वन्यजीव संदर्भात अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी व अधिकार या मंडळाला असून या मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे.
वन्यजीव आणि वनांचे रक्षण, नव्या प्रकल्पांवर चर्चा, नवीन संरक्षित क्षेत्रांना मंजुरी देणे यासह अनेक मुद्यांवर हे मंडळ कार्य करीत असते. पर्यटनाला चालना देण्यासोबतच वन्य जीवांची सुरक्षाही तेवढीच महत्वाची असल्यामुळे वनाधिकारी व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने या मंडळाकडून महत्वाची भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे.
या वेळी आमदार डॉ. संदीप धुर्वे म्हणाले की, जंगल आणि आदिवासींचे जिवाभावाचे नाते आहे. हे नाते कायम रहावे, जंगलाचा आदिवासींना व आदिवासींना जंगलाचा त्रास होऊ नये, ते एकमेकांना पूरकच असावेत या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संदीप धुर्वे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून दुसर्यांदा निवडून आले आहेत. यवतमाळ हा वन्यजीव संदर्भात महत्वाचा जिल्हा असून येथील ख्यातनाम टिपेश्वर अभयारण्य हे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्याच कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्यांची या मंडळावरील नियुक्तीही तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे.












































