Home महत्वाची बातमी पडळच्या कार्यक्रमात शरद पवार व येळगावकरांची चर्चा…

पडळच्या कार्यक्रमात शरद पवार व येळगावकरांची चर्चा…

144

कारखाना स्थळावर बोलवून घेतला पवारांनी खटाव माण मधील सिंचन योजनांचा आढावा

मायणी – सतिश डोंगरे

सातारा , दि. १८ :- माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात पाणीप्रश्नाची जाण असणारा नेता अशी ओळख आहे आणि याची प्रत्यक्ष प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार बुधवारी खटावच्या दौऱ्यावर असताना खटाव माण अँग्रो च्या साखर पोती पूजनाच्या कार्यक्रमात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवारांनी राजकीय चिमटे काढत त्यांनी विरोधकांना घायाळ करतानाच आगामी वाटचालीच्या दृष्टीने व्यूहरचना करणाऱ्या खेळ्याही खेळल्या. खटाव माण चा पाणीप्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने पवारांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना साद घालून आपल्या शेजारी बोलावून घेतले यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.सदर वेळी शरद पवार यांनी डॉ येळगावकर यांची माहिती लक्षपूर्वक जाणून घेतली. यामुळे पक्ष गट तट निवडणूकी पुरतेच प्रथम सामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य याची उपस्थितांना प्रचिती आली.

यावेळी टेंभू ,जिहे कटापुर,उरमोडी,तारळी,ब्रम्हपुरी योजनांचा चांगला अभ्यास असणाऱ्या डॉक्टरांकडून पवारांनी सिंचन योजनांचा आढावा घेतला व राजकीय साखर पेरणीही केली. पडळ येथील माण-खटाव अँग्रो साखर कारखान्याच्या दोन लाख एकावन्न हजार साखर पोत्यांच्या पूजन सोहळ्यासाठी खा. शरद पवार खटाव तालुका आले होते.

यावेळी बोलताना पवारांनी माण-खटाव तालुक्यातील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेवून पाणीप्रश्‍न मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पवार यांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना जवळ बोलावून त्यांच्याकडून पाणी सिंचन योजनांची माहिती घेतली. यावेळी डॉ. येळगावकर यांनी टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावातून सोळा गावांना पिण्यासाठी मिळविले आहे व माण तालुक्‍यातील वरकुटे- मलवडी येथील पाणी सिंचन योजनेसंबधी माहिती देताना माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर महाबळेश्‍वरवाडी तलावातून त्या परीसरातील १६ गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. सिंचनासाठी टेंभू योजनेच्या टप्पा क्र.३नंतरच्या घाणंद कालवा सा.क्र. ४०००मीटर (तलांक) ७३५.५१ नेऊन तेथून पाणी पंपाद्वारे उचलून १५०० मीटर लांबीच्या ऊर्ध्वगामी नलिकेतून ९५ मीटर उचलून नजीकचा डांगरमाथा (तलांक ८३० मीटर) येथे वितरण होदात सोडून ते पाणी पाईपलाईनद्वारे माण-र खटाव व आटपाडी तालुकयातील वंचित भागाला देणे शक्‍य असल्याचे डॉ. येळगावकर यांनी शरद पवार यांना सांगितले. तसेच वितरण हौदापासून कलेढोण -गारळेवाडी ता. खटाव येथे ८ कि.मी. लांबीच्या बंदिस्त नलिकेद्वारे खटाव तालक्यातील मुळीकवाडी, पाचवड, विखळे, पडळ, कान्हरवाडी, कानकात्रेवाडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, दातेवाडी या गावांचा समावेश करता येईल. तसेच डोंगररांग ओलांडून दुसरी बंदिस्त नलिका आटपाडी तालुक्‍यातून तरसवाडी, विभूतवाडी, गारूडीपासून बागलाचीवाडी, विरळी, जानेवाडी, कुडवाड, दोरग्याचीवाडी अशा एकूण ३० कि.मी भागाला बंदिस्त नलिकेद्वारे लाभ मिळू शकतो. यातून खटाव माण तालुक्यातील ७३२६ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, असे ही त्यांनी नमूद केले. तारळी योजनेचे पळसगाव, धोंडेवाडी परिसरातील बांधकाम लवकर पूर्ण करुन मायणी-चितळी पर्यंतच्या वंचित क्षेत्रास सिंचन लाभ द्यावा, अशीही मागणी डॉ. येळगावकर यांनी केली. जिहे कठापूर योजनेतून नेर तलावातून दरुज-दरजाई तलावाद्वारे सातेवाडी, पेडगाव ते एनकूळ, कणसेवाडी चा टँकर्रस्त भागाला बंदिस्त पाईपलाईनद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी देणेबाबत सर्वे पूर्ण झाला आहे. तो प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट – पडळ कारखान्यावरील सर्व पक्षीय ,राजकारण विरहित पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेले पवार साहेबांचं स्वागत, तसेच रासप चे मामुशेठ वीरकर, रणजितसिंह देशमुख,अनिल देसाई यांची उपस्थिती यासर्वात डॉ दिलीपराव येळगावकर यांनी खा शरद पवार व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी केलेली चर्चा व पवार साहेबांना या भागातील सिंचन योजनेचा दाखवलेला नकाशा यामुळे शरद पवार व डॉ.येळगावकर यांच्या व्यासपीठावरील भेटीची सर्वात जास्त चर्चा झाली.