सेवाग्राम आश्रमात पार पडला आझादी का अमृत महोत्सव उपक्रम…!
ईकबाल शेख
वर्धा:- गांधींचे विचार जनतेसाठी प्रेरणा देणारे ठरावे यासाठी सेवाग्राम आश्रम केवळ पर्यंटन स्थळ न राहता गांधी विचारधारा प्रचार व प्रसाराचे केंद्र बनावे. यासाठी सेवाग्रामच्या विकासासाठी राज्य शासनाने बजेट मध्ये विशेष लेखाशीर्ष निर्माण करून निधीची उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेवाग्रामच्या विकासासाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी आज बापूकुटी येथे आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात केले.
12 मार्चला महात्मा गांधींनी अहमदाबाद येथून दांडी यांत्रेचा प्रारंभ केला या दिनाचे औचित्य साधून देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 12 मार्च पासुन महाराष्ट्रात ऑगस्ट क्रांती मैदान मुबंई, आगाखान पॅलेस पुणे व वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील कार्यक्रमात श्री केदार बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, सर्व सेवा संघाचे प्रबंधक अशोककुमार शरण यांची उपस्थिती होती.
आजचा दिवस सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारा दिवस असून आजच्या दिवशी महात्मा गांधींजीनी साबरमती येथून दांडी यात्रा काढून मीठाचा सत्याग्रह केला. त्यांनी सत्य व अहिंसा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र मिळवून दिले. गांधीजींचे विचार पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी शासन कामे करीत आहे. सेवाग्राम ही तपोभूमी जगाला दिशा देणारी ठरेल असे श्री केदार म्हणाले.
गांधीजींनी 12 मार्चला अहमदाबाद येथून साबरमती पर्यंत दांडी यांत्रा काढली यात्रेमध्ये सुरवातीला 78 लोकांनी सहभाग नोंदविला होता. यात्रेमध्ये लोकांचा सहभाग वाढत शेवटी 60 हजार लोक दांडी यात्रेत सहभागी झाले आणि साबरमती येथे मीठाच्या सत्याग्रहाची क्रांती घडली. गांधीजीच्या सिंध्दातावर विचारावर देश चालत असून त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहेत.त्यांच्या आदर्शावर आज चालण्याची गरज असल्याचे खासदार रामदास तडस म्हणाले.
जगात पूर्वी झालेल्या हिंसेच्या क्रांतीला तोड देऊन गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या तत्वाचा वापर करुन क्रांती घडवून आणली, ही जगातील सर्वांत मोठी अहिंसक क्रांती आहे. सत्याची कास असल्यास कोणत्याही साम्राज्याविरुद्ध लढू शकतो हे गांधीनी अहिंसेच्या लढाईतून जगाला दाखवून दिले. त्यांच्या या अहिंसेच्या लढयात महिला , शेतकरी यांचा मोठा सहभाग होता. सामान्य माणसाला जे पाहिजे आहे तेच करायचे . गांधीचे विचार आजच्या पिढीनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या.
यावेळी अशोककुमार शरण यांनी गांधींच्या विचारावर मार्गदर्शन केले. तसेच आमदार रामदास आंबटकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी पालकमंत्री सुनील केदार यांनी बापूकूटी येथील बापूच्या समाधी स्थळावर सुतमाला अर्पण करुन आंदराजली अर्पण करून सामूहिक प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले. कार्यक्रमाला आश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.