
घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना – जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राजेगाव येथे ऋषीबाबाचे आश्रम आहे.येथे वर्षभर विविध प्रकारच्या मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांची आवकजावक असते. दर सोमवारी तर महिला,पुरूषांची मोठी गर्दी जमा होते.लाॅकडाउनच्या काळातही लोक गर्दी करू लागल्याने कोरोनाच्या भितीने गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या वतीने लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे.गर्दी करू नका,घरातच बसा , सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहोरात्र शासनासह समाजसेवी संघटना झटत आहेत. पोलिस , महसूल विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी ही जीव धोक्यात घालून कोरोना पासून बचाव करण्यासाठी मेहनत घेत आहेत.मात्र घनसावंगी शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेगावात लाॅकडाउनच्या काळातही झुलते आहे. हिहि…हुहू…हाहा करत येथील ऋषी आश्रमात मानसिक समस्यांनी पिडीत असलेल्या लोकांच्या अंगातील भूत कोरोनाची आफत गावात आणण्याची भिती निर्माण झाली आहे. काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की. राजेगाव येथे ऋषीबाबाचे आश्रम आहे. येथे मानसिक समस्यांनी पिडीत वेगवेगळ्या भागातून लोक येतात. करणीकोटाळ, चेटकी, भुताटकी ,छाछू केलेल्या लोकांना येथील आश्रमात फरक पडतो अशी लोकांची भावना आहे. येथे लोक कोठून येतात हे सांगता येत नाही.तशी नोंदही घेतली जात नाही. कुणी पाच सोमवार करतात तर कुणी सव्वामहीना येथे राहून अनुष्ठान करतात.जगभरात कोरोनाची महामारी सुरू असताना मुक्त संचारबंदी लागू आहे . प्रशासकीय आदेशानुसार सर्व धार्मिक सामाजिक कार्यक्रमांवर बंदी आहे,देऊळ बंद आहेत.मात्र राजेगावातील ऋषी आश्रमाला प्रशासनाने सुट दिली आहे की काय ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.दर सोमवारी दुपारी आरतीच्या वेळी गर्दी होते.आरतीनंतर पिडित महिला, पुरूषांच्या अंगात येते … यावेळी सोशल डिस्टंन्सचे आदेश पायदळी तुडवीले जातात. मानसिक समस्यांनी पिडीत,भुतबाधा झालेले लोक आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा एकच कल्लोळ होतो.हा प्रकार लाॅटडाउनच्या काळात अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.प्रशासनाने या बाबतीत दखल घ्यावी ,अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.











































