Home मराठवाडा अत्यावश्यक असल्यास घरा बाहेर पडा आरोग्याची काळजी घ्या , जिल्हाधिकारी ,रविंद्र बिनवडे

अत्यावश्यक असल्यास घरा बाहेर पडा आरोग्याची काळजी घ्या , जिल्हाधिकारी ,रविंद्र बिनवडे

177

 जालना,/ सय्यद नजाकत   कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन नागरिकांनीही या विषाणुचा प्रसार होऊ नये यादृष्टीने येणाऱ्या पंधरा दिवसात अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. परदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.             यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ. खतगावकर, तहसिलदार श्री पडघन, संतोष बनकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोनाचे गांर्भीय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन गर्दी जमणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याच्या सुचना देण्याबरोबरच आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.  बाजारामधील जीवनाश्यक वस्तु किराणा दुकान, दुध, औषध विक्रेता, भाजीपाला आदी दुकानांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात क्वारंटाईनचे तीन ठिकाण निश्चित करण्यात आले असुन सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांना तालुकास्तरावर शोध घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 217 उपकेंद्रावर डॉक्टर्स, ए.एन.एम, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी व ग्रामसेवक यांचा आराखडा तयार करण्यात येत असुन जनतेचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्याबाबतच्या माहितीचे मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन एस.टी. महामंडळातील बसेस व खासगी बसेसना स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच प्रवासामध्ये आजारी असलेल्या प्रवाशांची यादी तयार करुन ती प्रशासनाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  अन्न व औषधी विभागामार्फत दुकानांची तपासणी करुन औषधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येत असुन जनतेला सॅनीटायजर व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात दूरध्वनी,  इंटरनेट व विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले. विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांची शासन दरबारी असलेली कामे करण्यासाठी कार्यालयात ड्रॉपबॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तसेच  ई-मेल अथवा व्हॉटसअपद्वारे नागरिकांनी त्यांच्या कामासंदर्भात संदर्भात संपर्क साधावा. सात दिवसांमध्ये त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनापासुन बचावासाठी प्रत्येकाने आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.  सातत्याने गरम पाणी पिणे, स्वच्छ, ताजे व पौष्टिक अन्न खावे, सातत्याने साबानाने हात धुवावेत, सर्दी खोकला, ताप असल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी.  तसेच जनतेने जागरुक रहावे. कुठलीही माहिती लपवु नये व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दि. 12 मार्च रोजी एक रुग्ण दाखल झाला होता.  त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने रुग्णाला साधारण कक्षामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. दि. 16 मार्च रोजी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 34 जणांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे.  तसेच  दि. 17 मार्च रोजी प्रत्येकी एक रुग्ण दाखल असुन त्याचेही नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 4 जणांची तपासणी करुन अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच जालना शहरातील सात व्यक्ती थायलंड येथे 5 मार्च रोजी गेल्या होत्या.  त्या व्यक्ती दि. 11 मार्च, 2020 रोजी जालना शहरात परतल्या असुन त्यापैकी पाच व्यक्तींची तपासणी करुन त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असुन इतर दोन व्यक्ती इतर शहरात गेल्या असुन त्यांनाही सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.