Home महत्वाची बातमी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मगुरूंना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मगुरूंना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

166

अब्दुल कय्युम

औरंगाबाद, दिनांक 17 : राज्यातील विविध धार्मिक स्थळे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी स्वत:हून भाविकांना दर्शनासाठी मंदीरे व देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असलेली सर्व धार्मिक स्थळे इत्यादींनी नियमीत पूजा – अर्चा व धार्मिक विधी वगळता भाविकांसाठी पुढील दोन आठवडे दर्शनास बंद ठेवल्यास कोविड-19 रोगाचा समाजामार्फत होणारा संसर्ग कमी होण्यास निश्चित मदत होणार असल्याने धार्मिक संस्थांना आवाहन करण्यात येते की , देवस्थान परीसरात भाविकांची गर्दी होणार नाही आणि संभाव्य कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यादृष्टीने आवश्यक सर्व खबरदारीच्या उपाययोजना आपल्या स्तरावर करण्यात याव्यात .
तसेच कोविड – 19 रोगाचा प्रसारही आपती – घोषित झाल्यामुळे अशा आपत्ती सदृश्य परिस्थितीत सर्व मस्जिद मधून किमान पुढील दोन आठवडे एकत्रित नमाज अदा करण्याऐवजी घरीच नमाज अदा करण्या बाबत आवाहन केल्यास देखील लोक एकत्रित होण्यापासून परावृत्त होऊन रोगाचा संसर्ग टाळता येऊ शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे. तरी याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आवाहन सर्व उलमा / पेशमाम / मोलवी यांना करण्यात येत आहे. चर्च, गुरुद्वारा , बौध्दविहार तसेच इतर सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे या ठिकाणी देखील अत्यावश्यक धार्मिक कार्य वगळता, किमान पुढील दोन आठवडे लोक एकत्रित येऊ शकतील असे सर्व कार्यक्रम टाळण्याचे आवाहन याद्वारे सर्व धर्मगुरुना करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आले असुन, जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे देखील 07 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. सर्व स्थानिक जत्रांना / यात्रांना देखील परवानगी देण्यात आलेली नाही.
*****