Home जळगाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; विद्यार्थी जागीच ठार

ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; विद्यार्थी जागीच ठार

133

कुसूंबाजवळील घटना , एक जण गंभीर

रावेर (शरीफ शेख)

जळगाव बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या दोन विद्यार्थ्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अक्सा नगरातील विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी कुसुंबा गावाजवळील हॉटेल नीलांबरी जवळ घडली . यात एक विद्यार्थी गंभीर झाला असून ट्रॅक्टर चालकही जखमी झाला आहे. दरम्यान ट्रॅक्टर चालक दारू पिलेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शहरातील मिल्लत ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी अदनान खान (वय १७, रा. अक्सानगर) व शेख मोहंमद शेख अब्दुल रहमान कुरेशी (वय १७, रा. तांबापुरा) या दोघांचा आज ११ ते २ असा हिंदीचा पेपर कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालययेथे होता. पेपर सुटल्यानंतर हे दोघं जण आपल्या दुचाकीवरून घरी परत येत होते. साधारण सव्वा दोन वाजेच्या सुमारास हॉटेल निलांबरी जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. यात दुचाकी चालविणारा अदनान खान हा जागीच ठार झाला. तर शेख मोहंमद हा गंभीर जखमी झाला आहे . त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे कळते. दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर चालक देखील जखमी झाल्याचे कळते.दरम्यान मयत अदनानचे वडील रिक्षाचालक आहेत .दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . यावेळी करीम सालार , अजिज सालार , डॉ. इक्बाल शाह, मुश्ताक मिर्झा, रियाझ बागवान ,सलीम इनामदार ,फारूक शेख , जाकिर पठान, अनिस शाह, अशफाक मिर्ज़ा, आदींनी जिल्हा रुग्णालयात घटनेनंतर माहिती घेऊन विचारपूस केली .

तर अपघात घडला नसता ; नागरिकांच्या प्रतिक्रिया

शहराबाहेर असणारे परीक्षा केंद्रामुळे आणि जीवघेणा महामार्ग असल्याने मिल्लत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कुसुमबा येथील स्वामी समर्थ विद्यालयात परीक्षा केंद्र ठेवण्याची गरज नव्हती . शहरातील जवळपास असणारे केंद्र या कॉलेजच्या विद्यार्थ्याना दयायला पाहिजे होते . तर असा अपघात घडला नसता अशा संतप्त प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांकडून उपस्थित केल्या जात होत्या . याबद्दल शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याचे काहींनी सांगितले .