Home महाराष्ट्र महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने थायलंडमधील आंतराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने थायलंडमधील आंतराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर

107

स्त्रियांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी समान संधी  –  संशोधनाचा निष्कर्ष

चांगले किंवा वाईट व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनातील आध्यात्मिक पैलूशी संबंधित असते. उच्च आध्यात्मिक पातळी असलेला अर्थात् चांगली साधना करणारा नेता हा नि:स्वार्थी असतो आणि तो समाजाच्या भल्यासाठी कार्य करतो. याउलट ज्याची आध्यात्मिक पातळी अल्प असते अर्थात साधना न करणारा नेता इतरांविषयी अल्प विचार करतो. स्त्री असो वा पुरुष बहुतेक नेते साधना करत नाहीत, त्यामुळे ते नकारात्मकतेने लवकर प्रभावित होतात. त्यामुळे त्यांच्या कृती आणि निर्णय यांचा समाजावर वाईट परिणाम होतो. आध्यात्मिक साधना केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी अन् खर्‍या अर्थाने नेते बनण्यासाठी सम प्रमाणात साहाय्य करते, *असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या सौ. श्वेता क्लार्क यांनी केले.*

त्या बँकॉक, थायलंड येथे ‘टुमारो पिपल’ या संघटनेने आयोजित केलेल्या ‘14 व्या महिला नेतृत्व आणि सक्षमीकरण परिषद, 2023’ (डब्ल्युएलईसी 2023) या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या परिषदेत सौ. श्वेता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘अध्यात्म महिला नेत्यांना कसे सक्षम बनवते’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटातील साधक श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क या सहलेखक आहेत.

*सौ. श्वेता या वेळी म्हणाल्या की,* उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुष आणि अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुष अशा दोन गटांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) द्वारे चाचणी घेण्यात आली. उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात आढळून आली, तर अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळून आली. अन्य एका चाचणीमध्ये असे आढळून आले की, केवळ 30 मिनिटे नामजप केल्यावर स्त्री-पुरुषांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ लक्षणीयरित्या अल्प झाली. या संपूर्ण प्रयोगांचे निष्कर्ष मांडतांना सौ. श्वेता म्हणाल्या की, खर्‍या अर्थाने नेता बनण्यासाठी प्रत्येकाने आपले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक जीवन जगण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे.