
यवतमाळ (प्रतिनिधी) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (दाते कॉलेज) १९९४ पासुनच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या रौप्य महोत्सवी एकत्रीकरणातुन निसर्ग सेवेचे व्रत जपले आहे. ‘मैत्र जीवांचे@25’ या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करुन गुरुजनांच्या उपस्थितीत पर्यावरण सेवेचा संकल्प युवकांनी केला.
दाते कॉलेजच्या प्रांगणात दिप प्रज्वलनानंतर सुरु झालेल्या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी यांचेसह माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. तत्कालीन दिवंगत प्राचार्य सु.ल. देशपांडे यांचेसह स्व. गो. ना. देशपांडे, स्व. शैलजा रानडे यांना अतिथींसह उपस्थित सर्वांनी श्रध्दांजली वाहिली. निधन झालेल्या वर्गमित्रांना देखील पुष्पांजली वाहण्यात आली. गुरुस्तवनाच्या स्वरात विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा शाल, रोपटे आणि गुरुवंदन पत्र प्रदान करित त्यांचे आशीर्वाद घेतले. मेळाव्याचे आयोजनाकरिता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन महेश ढवळे, सविता ढाले व अश्विन सवालाखे यांना शाल व रोपटे प्रदान करुन अतिथींनी सन्मानीत केले.
प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि संस्कारातुन घडलेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या नावानेच एस एल फाउंडेशनची मुहुर्तमेढ रोवत पर्यावरण सेवेचा ध्यास जाहीर केला. मेळाव्यात स्वागतक म्हणुन स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा बाहेर गावांमध्ये वास्तव्यास असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले. मेळाव्यात पीपीटी द्वारे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातुन अनेक वर्षांचा दुरावा मागे सारत आपल्या वर्गमित्रांसमोर वर्तमान उलगडला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली, मोबाईल नंबर सेव्ह करणे, आपल्या मुलांचा परिचय करुन देणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, आपले रुसवे फुगवे दुरु करणे, गळाभेट व सेल्फीद्वारे आठवणी छायांकित करणे, आपल्या आईवडीलांची विचारपुस करणे असे गहिवर आणणारे क्षण कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित अनुभवत होते. यावेळी प्रा. नारायणराव मेहरे, प्रा. माधव सरकुंडे, प्रा. सी. बी. देशपांडे, प्रा. भीमराव ठोंबरे, प्रा. अनंत पांडे, प्रा. अशोक खंडारे, प्रा. माणिक मेहरे, प्रा. उज्वला भालेराव, प्रा. स्वाती तिवसकर, सर्वश्री विजय दिक्षीत ज्ञानेश्वरराव इटकरे, मनोहरराव बागडे आदी उपस्थित होते.











































