Home विदर्भ भारसवाडा येथे गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

भारसवाडा येथे गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

215

इकबाल शेख – वर्धा

वर्धा जिल्हातील आष्टी तालुक्यातील भारसवाडा येथे आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. जिल्ह्यात दारू बंदी असल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारू कडे वळला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध गावठी दारूवाले जास्त फोफावल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील विविध गावात हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनांसाठी जंगलांचा वापर केला जातो आहे. यामुळे या जंगलाचा फायदा घेत सर्रास गावठी दारुची विक्री होत आहे. पोलीस प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. गावठी दारुची आतिशय घातक असुन सुरवातीला अवैध दारू तयार करण्यासाठी नवसागर काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू करणाऱ्यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विरोधात केसेस केल्या जात असल्या तरी अवैध दारूची निर्मिती बंद झालेली नाही. दोघांच्याही कारवाईचा तुलनात्मक अभ्यास केला तर दारूच्या भट्यांवर कारवाईपेक्षा अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. असे मत सामान्य लोक व्यक्त करत आहेत.