
मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर,दि : २९:- तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी केली आहे.
परिवार संवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माहूर गडावर मुक्कामी आलेल्या जल संपदा मत्री जयंत पाटील यांना तीर्थक्षेत्र माहूरला भेडसावत असणाऱ्या पाणी समस्या कायमची निकाली काढण्या साठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी धनोडा येथे उच्च पातळी बंधारा निर्माण करण्यात यावा असे निवेदन देऊन उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. माहूर शहराची लोकसंख्याही अंदाजे २० हजार इतकी आहे. तसेच माहूर हे साडे तीन शक्तीपिठापैकी एक आहे. तसेच दत्ताचे पूर्णपिठ आहे. त्यामुळे येथे चल लोकसंख्याही जवळपास दररोज १० हजार इतकी आहे. तसेच नवरात्र व दत्त जयंती च्या वेळेस लाखो भाविक येथे येत असतात. प्रत्यक्षात माहूर शहरास डिसेंबर महिण्यानंतर पाणी प्रश्न भेडसावत असतो व त्या मुळे पाणी टंचाईच्या काळात दिगडी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते. याचा वरील बंधाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या सिंचनावर परिणाम होत आहे. माहूर शहराची पूर्ण पाणी मागणी ही ३.००दलघमी (बाष्पीभवनसह) इतकी आहे. या ठिकाणी बंधारा झाल्यास परिसरातील माहूर शहर व जवळपास २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. प्रस्तावीत माहूर (धनोडा) उच्च पातळी बंधारा प्रकल्प हा निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येतो. सदर ठिकाणचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी शाश्वत पाण्याची आवश्यकता आहे.अशी मागणी केल्याने नामदार जयंत पाटील यांनी पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा लवकरच निर्माण करण्याचे आश्वासन दिले.











































