Home विदर्भ युवा वर्गाने लसीकरणापुर्वी स्वेच्छेने रक्तदान करावे – डॉ.रिपल राणे

युवा वर्गाने लसीकरणापुर्वी स्वेच्छेने रक्तदान करावे – डॉ.रिपल राणे

168

शासनाद्वारे सर्वाना मोफत कोरोना लसीकरण करण्यात यावे…..

शासनाच्या निर्देशानुसार येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार येत्या २८ एप्रिल पासून नोंदणी सुरु होणार आहे. मात्र राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदने दिलेल्या निर्देशानुसार लसीकरण केल्यानंतर २८ दिवसापर्यंत रक्त देता येत नाही. सध्या महाराष्ट्रातील सर्व ब्लड बॅंक मध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे,गरजू रुग्णांना रक्ताची गरज लक्षात घेता युवकांनी लसीकरणापूर्वी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन आर्वीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ व सामाजिक कार्यात तसेच कोरोना लसीकरण मोहिमेत हिरारीने सहभाग घेणारे डॉ.रिपल राणे यांनी केले आहे.
शासनाने टप्प्याटप्याने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्यांदा कोरोना योद्धा यांना, नंतर ६० व ४५ वर्षावरील नागरीकांना लसीकरण करण्यात आले ,आता त्याची व्याप्ती करत १८ वर्षावरील सर्वांनाच लस घेता येणार आहे. मात्र आजच्या परिस्थितीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सामाजिक संघटना यासाठी पुढे सरसावल्या त्यांनी जागोजागी रक्तदान शिबिरे आयोजित करुन रक्त गोळा केले जात आहे. आर्वीमध्ये देखील लायन्स क्लब च्या वतीने तसेच अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने शिबिरे आयोजित करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा आज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लक्षात घेता युवकांनी स्वतःहून पुढे येउन रक्त दान करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेनुसार कोरोना लसीकरणानंतर आपण २८ दिवस पर्यंत रक्त दान करु शकत नाही. व २८ ते ४५ दिवसानंतर लसीकरणाचा दुसरा डोज येतो म्हणजे मग त्यानंतर पुन्हा २८ ते ४५ दिवस रक्त दान करु शकणार नाही. म्हणजे तब्बल ३ महिने रक्त दान करु शकणार नाही. तसेच रक्त दान करणारा मोठा समूह हा १८ वर्षाच्या वरील युवा वर्ग असतो, त्यांचेच लसीकरण होत असल्यामुळे सर्वांनी आधी रक्तदान करावे नंतर लसीकरण करावे. रक्ताचा एकमेव स्त्रोत मानवी शरीरच असल्यामुळे रक्ताची गरज दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून भागवता येत नाही हे विशेष म्हणून समाजातील युवक व युवतींनी स्वइच्छेने सामोरे येणे गरजेचे आहे.
समाजातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जवाबदारी ही शासनाची असल्यामुळे ,माहामारीच्या या काळात सर्वांची आर्थिक व्यवस्था कोडमोडली असून शासनाने सर्व युवकांना व जेष्टनागरीकांना ही कोरोना लस मोफत उपलब्ध करावी अशी मागणी आर्वी येथील लायन्स क्लबचे संथापक अध्यक्ष डॉ.रिपल राणे यांनी केली आहे.