Home महत्वाची बातमी झी 24 तासचे रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांच्यावर झालेला अन्याय पोटतिड़कीने मांडला…!

झी 24 तासचे रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांच्यावर झालेला अन्याय पोटतिड़कीने मांडला…!

217

पोलिसांनी पत्रकार सुनील ढेपे यांच्यावरही अदखलपात्र खोटा गुन्हा दाखल केला

उस्मानाबाद , दि. १६ :- झी २४ तास पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी सडेतोड बातम्या देणारे उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, निष्क्रिय आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक राजतिलक यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली आहे.

उस्मानाबाद मध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनात झी २४ तास पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी सडेतोड बातम्या देऊन पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांचे वाभाडे काढले होते.

त्यामुळे पोलिसांनी पत्रकार सुनील ढेपे यांचा आवाज बंद करण्यासाठी तसेच मुस्कटदाबी करण्यासाठी सुनील ढेपे यांच्यासह ही पोस्ट शेयर करणारे आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्यावर अदखलपात्र खोटा गुन्हा दाखल केला आहे. राजतिलक रोशन यांनी सन २०१६ मध्येही पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह 3 पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केला होता, त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

पोलिसांनी दिलेली प्रेस नोट अशी ,

“पोलीसांविषयी अप्रीतीची भावना पसरवली, गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, आनंदनगर: सुनिल ढेपे व बाळासाहेब सुभेदार, दोघे रा. उस्मानाबाद यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरुन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या विरोधात निराधार बदनामी कारक मजकुर प्रसिध्द केला. अशा प्रकारे त्यांनी पोलीसांचे मनोबल खच्ची करुन समाजात पोलीसांविषयी अप्रीती, अनादर पसरवून पोलीसांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. यावरुन सायबर पो.ठा. चे स.पो.नि. श्री. सचिन पंडीत यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन नमुद दोघांविरुध्द पो.ठा. आनंदनगर येथे पोलीस ( अप्रीतीची भावना चेतवने ) कायदा -कलम 3 अन्वये गुन्हा दि. 14.01.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

बिहारी बाबू, आता तरी जागे व्हा.. !

झी 24 तासचे उस्मानाबाद रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून दोन दिवस लोटले तरी पोलीस अधिक्षक असलेल्या बिहारी बाबूने अजून दखल घेतलेली नाही, ते बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

या धक्काबुक्की प्रकरणी राज्यभरातील पत्रकारांनी निषेध नोंदविला, त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याची दखल घेतली, मात्र बिहारी बाबू पोलिसांवर कारवाई करण्याच्या मनःस्थितिमध्ये नाहीत.

उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रकारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यातील मोजक्या पत्रकारांबरोबर बिहारी बाबूचे सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे त्याना इतर पत्रकारांशी काही घेणे देणे नाही. हे बिहारी बाबू सन 2016 मध्ये उस्मानाबादलाच सहायक पोलीस अधीक्षक असताना, विरोधात बातम्या दिल्या म्हणून दैनिक गावकरीच्या तीन पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केला होता, जे पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करतात, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करणार ?

तुळजापूर मध्ये राहुल कोळी या पत्रकारास स्थानिक पोलिस निरीक्षक गवळी यांनी विनाकारण बेदम मारहाण केली होती, त्याविरुद्ध स्थानिक पत्रकारांनी आवाज उठवला, निवेदन दिले पण एक महिना झाला तरी काही कारवाई नाही, आता मुस्तान मिर्झावर वेळ आली, उद्या आणखी कुणावर तरी येईल, पण पत्रकार जागे झाले नाहीत तर काळ कठीण आहे.

मुस्तानला पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की विरुद्ध आज काही पत्रकार एकत्र आले, त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकाना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली, पण जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पत्रकरांनी हे प्रकरण उचलून धरले पाहिजे.

या बिहारी बाबूला नीट मराठी बोलता येत नाही,मराठी लिहिता येत नाही तरी त्यांनी एक पुस्तक लिहिले म्हणे, त्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात करण्यात आले म्हणे. हे महाशय मंत्र्यांना खाली बसवून वर व्यासपीठावर बसले होते, त्यांनी साहित्य संमेलनास पोलीस विभागाकडून पाच लाखाची देणगी दिली, ही देणगी नेमकी कुणाकडून गोळा करण्यात आली, याचा खुलासा झाला पाहिजे.

बिहारी बाबूने मोठी देणगी दिली म्हणून साहित्य संमेलनातील संयोजक पत्रकार त्यांची हुजरेगिरी करीत होते, त्यांनी जरुर हुजरेगिरी करावी पण मुस्तानवर जो अन्याय झाला त्याबद्दल ब्र शब्द काढत नाहीत, इतकेच काय तर आज निवेदन द्यायला सुद्धा आले नाहीत, बहुतेक श्रमपरिहार करून झोपले असतील.

उस्मानाबादला बिहारी बाबू आल्यापासून पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे, पोलीसच पत्रकारांना ठोकून काढत आहेत, विरोधात बातमी दिल्यास टार्गेट करीत आहेत, राज्याच्या गृह विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. फडणवीस सरकारच्या काळात काही पोलीस अधिकारी मुजोर झाले आहेत, त्यापैकी हे बिहारी बाबू आहेत. यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे.

सुनिल ढेपे ( जेष्ठ पञकार )