
खाडीपट्टा – रघुनाथ भागवत
रायगड , दि. ११ :- स्त्रीचा सन्मान व्हावा ही संकल्पना समाजासाठी प्रेरणादायी असून आपली आई हीच आपली देवी आहे त्यामुळे तिचा सन्मान करा अशा प्रकारचे मौलिक उदगार महाड शहरातील नामांकित अशा सुनील गांधी क्लास च्या संचालिका सौ. स्नेहा सूनील गांधी यांनी महाड तालुक्यातील लाडवली येथे व्यक्त केले.
पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबर म्हणजेच थर्टीफर्स्टच्या दिवशी “आदर्श माता पुरस्कार” वितरण सोहळा ही संकल्पना रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष घरटकर आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजलीताई घरटकर या दाम्पत्याने अंमलात आणून प्रत्येक महिलेचा सन्मान व्हावा या संकल्पनेतून आदर्श माता पुरस्काराची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली, दरम्यान हा सोहळा गेली तीन वर्षे सुरू असून याहीवर्षी आनंदी अशा वातावरणात हा गोड असा सोहळा संपन्न झाला. दरम्यान आपल्या भाषणामध्ये बोलताना सहज सौ.स्नेहा गांधी मॅडम यांनी या विशेष अशा सोहळ्याचे भरभरून कौतुक केले. प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हावा ही पत्रकार संतोष घरटकर यांची संकल्पना समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार सौ. स्नेहा गांधी यांनी यावेळी व्यक्त केले. रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे मार्फत समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपली मुलं घडविणाऱ्या पाच मातांचा “आदर्श माता पुरस्कार” देऊन सौ. गांधी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सदर गोड सोहळ्यासाठी सौ. स्नेहा गांधी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, त्यांच्या समवेत महाड शहरातील नामांकित अशा गांधी क्लासचे सर्वेसर्वा सुनील गांधी, रविशंकर वेर्णेकर, ऋतुजा वेर्णेकर, विलास खोपकर, रमाकांत सुतार आदी व्यासपीठावर उपस्थित होते, दरम्यान या सोहळ्यात सौ.सुरेखा दीपक गुंजवटे, सौ. सुनंदा धनराज गोपाळ, सौ.स्मिता जोशी, सौ.सपना शेठ, सौ.नीता घोले या मातांना आदर्श माता पुरस्कार सन्मान देऊन विशेष सोहळा यावेळी पार पडला.
दरम्यान आपल्या गौरवोद्गार आशा भाषणात सौ. स्नेहा गांधी पुढे म्हणाल्या की, हा सोहळा एक स्तुत्य उपक्रम असून घरातील स्त्रीचा सन्मान करणे ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे मी पत्रकार संतोष घरटकर यांना माझ्याकडूनच नाही तर संपूर्ण महिला वर्गाकडून धन्यवाद देते, अशा शब्दात कौतुक करून आदर्श माता पुरस्कार हा अत्यंत विलक्षण, अद्भुत असा पुरस्कार आहे, कारण प्रत्येक क्षेत्रात महिला ही पुरुषांबरोबर अनेक भूमिका जरी पार पडत असल्या त्यामध्ये ती सासु झाली, सून झाली तरी ती माता हीच सर्वांगण सुंदर आहे, आणि तिला मातेची भूमिका निभावताना खूप कष्ट पडतात. जसे एखाद्या रोपट्याला खत-पाणी दिल्याशिवाय ते बहरत नाही तसे आई आपल्या मुलांना चांगले संस्कार करून दिशा देण्याचे काम करते हे आजच्या या सोहळ्यात पहायला मिळाले, असे गौरवोद्गार गांधी मॅडम यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की आज स्त्रीने आकाशात झेप घेतली असून चूल, मूल ही संकल्पना कधीच संपून स्त्री प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्त्रीकडे खूप चांगले गुण असतात, तिच्या गुणांना कौतुकाची थाप मिळाली तर तिला नक्कीच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल आणि हे काम पत्रकार संतोष घरटकर यांनी केल्यामुळे खरोखरच त्यांच्या या कार्याला माझा सलाम आहे. अशा शब्दात सौ.गांधी यांनी पत्रकार घरटकर यांचे कौतुक केले. कावळा, चिमणीचे घर शेणाचे आणि मेनाचे अशी अनेक उदाहरणे देत स्त्री ही दशभुजा आहे असे सांगून आपण ज्या आईच्या उदरी जन्म घेतला त्या आईची ओटी भरा, तिचा सन्मान करा, तेच देवदर्शन असते आणि आपल्या आईच आपली देवी आहे त्यामुळे तिचा सन्मान करा तेच देवदर्शन असते आणि आपली आईच आपली देवी आहे, त्यामुळे तिचा सन्मान करा अशा प्रकारचा मौलिक सल्ला ही स्नेहा गांधी यांनी या प्रसंगी उपस्थित असलेल्या महिलांना दिला. आई-मुलाचे नाते आणि विश्वास, सप्तरंग आणि आईमुळेच मी मोठा झालो ही भावना जोपासा असेही सौ. गांधी यांनी शेवटी बोलून दाखवले.
याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबर आपल्या मुलांना सुसंस्कृत घडविणाऱ्या मतांसह सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या कुंदन सुतार, नितीन गावडे या दोन युवा तरुणांचा देखील स्नेहा गांधी मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान आदर्श माता पुरस्कार प्राप्त महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये पोलादपूर येथील पत्रकार धनराज गोपाळ यांचे चिरंजीव विकास गोपाळ यांनी महिलांसाठी एक चांगल्या प्रकारची माहिती आपल्या भाषणात सांगितली. महिलांना मासिक पाळी मध्ये होणारा त्रास, अडचणी याबाबत अत्यंत चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केल्याने सौ.गांधी मॅडम यांच्यासह सर्वच मान्यवरांनी, उपस्थितांनी विकास गोपाळ यांचे कौतुक केले.
सदर गोड आशा सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रल्हाद ठाकूर सर यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमध्ये करून मान्यवरांसह सर्वच उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन केल्याबद्दल सौ. स्नेहा गांधी यांनी प्रल्हाद ठाकूर सर यांचे देखील खास अशा शब्दात कौतुक केले. सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ.अंजली घरटकर, विलास खोपकर, उषा खोपकर, नितीन गावडे, ऐश्वर्या गावडे, मंदार खोपकर, यश घरटकर आदींनी विशेष असे परिश्रम घेतले.










































