Home जळगाव सरस्वती विद्या मंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम.

सरस्वती विद्या मंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम.

568

रावेर (शरीफ शेख)

जळगांव शहरांची वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, वाहनांची वाढणारी संख्या, झाडांची तोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास अशी शहरांपुढे पर्यावरणाची आव्हाने आहेत. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे याच पर्यावरणातल्या एका घटकाकडून दुसऱ्याकडे आलेल्या एका विषाणूने जगभर थैमान घातलंय. पर्यावरणाचा आणि आपल्या आयुष्याचा किती जवळचा संबंध आहे, हे या जागतिक साथीदरम्यान सगळ्यांच्याच लक्षात आलं. यामुळे आपण जगत असताना पर्यावरण वाढीवर भर द्यावा हा हेतू ठेऊन शहरातील सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्वामी समर्थ संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, चेतन निंबोळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वसाणे, किशोर घुले,यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच वाटलेले रोपे जगवून प्रत्येक वर्षी २३ जुलै ला या रोपाचा वाढदिवस साजरा करून ज्या विद्यार्थ्यांचे रोप जगेल त्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासित करण्यात आले. आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय, स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे. असा संदेश यावेळी देण्यात आला. सदर उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले तर सविता ठाकरे, ब्रह्माणकार मॅडम, मानसी जगताप यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे कौतुक संस्थाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.