Home मुंबई कोविड १९ संदर्भात राज्यात आता पर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ल्यांच्या...

कोविड १९ संदर्भात राज्यात आता पर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ल्यांच्या १८४ घटना, ६६३ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

206

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतू काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९५,६७८ गुन्हे नोंद झाले असून १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

१०० नंबर २४ तास कार्यरत

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला. ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६४२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,११,६३८ व्यक्ती Quarantine आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३,०७१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ व पुणे येथील १ अशा ४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण ४८०८ हजार रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ४,४२,२९८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.