Home महाराष्ट्र मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे, राज्य ग्रीन झोनमध्ये...

मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे, राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे  – मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…!

201

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – “विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने करोनाची परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाउन करणे सोपे होते. पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी सर्वांना दिले.

“अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंद्वारे सर्वांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. “थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहिल हे पाहिलेच पाहिजे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको*

“ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले. मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. “घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतच आहे. पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल,” हेही त्यांनी स्पष्ट केले.

*नॉन कोविड रुग्णास दुर्लक्षित करू नका*

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, “रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्वाचे आहे.” “आपापल्या भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या,” असे आवाहनही त्यांनी केले.

*महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या*

प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले आणि ५ दिवसांची सरासरी सादर केली. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत तसेच देशातील एकूण मृत्यूच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात ३.२३ टक्के आहे तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष १२२५ चाचण्या महाराष्ट्रात होतात त्या देशात सर्वाधिक आहेत, असे सांगितले.