Home महाराष्ट्र तरच करोनाविरुद्धचे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल – देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना...

तरच करोनाविरुद्धचे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल – देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

289

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी ‘आयसीएमआर’च्या निकषांचं तंतोतंत पालन करण्याबरोबरच महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनाचं पालन करण्याची विनंती फडणवीस यांनी केली असून, त्यानंतरच आपल्याला करोनाविरुद्धचे युद्ध प्रभावीपणे लढता येईल,’असं म्हटलं आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील करोनाच्या स्थितीकडे लक्ष वेधण्याबरोबरच काही गोष्टींचं पालन करण्याची विनंती केली आहे. ‘१५ एप्रिल २०२० रोजी मुंबई महापालिकेने लक्षणं नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्याच्या सरासरीच्या कितीतरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या निर्देशांप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी, अशी माझी विनंती आहे. लक्षणं नसलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश ‘आयसीएमआर’नं स्पष्टपणे दिले असताना मुंबई महापालिकेनं मात्र आवश्यकता वाटली तर करता येईल, असा आदेश काढला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्य विभागाच्या १८ एप्रिल २०२० च्या अहवालाकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आहे. ‘राज्यात उपलब्ध केसेसपैकी ६३ टक्के रूग्ण हे लक्षणं नसलेले आहेत. तर रूग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ७९ टक्के रूग्ण हे लक्षणं असलेले आहेत. याचाच अर्थ लक्षणं नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सांख्यिकीदृष्ट्या ही रूग्णसंख्या कमी दिसेल आणि प्रत्यक्षात मात्र धोका वाढेल. त्यामुळे असे निर्णय करणे योग्य होणार नाही,’ अशी भीती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

१८ एप्रिल २०२० रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह रूग्णांची राज्य सरकारने दिलेली संख्या १८३ इतकी आहे. हीच संख्या मुंबई महापालिकेने ८७ इतकी दिली. मात्र, त्याचवेळी मुंबई महापालिकेने तळटीप टाकून ४ खाजगी प्रयोगशाळांनी १२ ते १५ एप्रिल २०२० या दरम्यान केलेल्या चाचण्यांचा अहवाल आज दिला असून, त्यात ३०२ अहवाल पॉझिटिव्ह आले, असे सांगितले आहे. मुंबई महापालिकेने तळटिपेत दाखविलेले व्यक्ती हे यापूर्वीच रूग्णालयात दाखल झालेले असल्याने रूग्णालयात दाखल या रकान्यात आहेत. मात्र ते करोना पॉझिटिव्हच्या एकूण संख्येत समाविष्ट करण्यात आले आहेत का? हे समजत नाही. आणि तसे न करण्याचे कारणही लक्षात येत नाही. महापालिकेने ही संख्या ८७ अधिक ३०२ दाखविणे आवश्यक होते. त्यामुळे एकूणच रिपोर्टींगमध्ये त्रुटी का येत आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकूण ही सर्व परिस्थिती पाहता कोविड पॉझिटिव्हच्या संख्येची लपवालपवी करण्याचा प्रयत्न का होतो आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण स्वत: यात गांभीर्याने लक्ष द्यावे व लक्षणं नसलेल्या व्यक्तींची चाचणी तसेच कोविड पॉझिटिव्हचे उचित रिपोर्टिंग होईल, याकडे लक्ष द्यावे. यातूनच प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन आपल्याला आपली लढाई योग्य दिशेने नेता येईल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.