
फुलचंद भगत
वाशिम:-पुर्वी ‘खाकी’ला खुप मान होता पण अलिकडे पोलिसांविषयी जनतेच्या मनात नकारात्मकता ऐकायला मिळते पण अशातही काही खाकीतील मानुसकी जपणारे अधिकारी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात त्यातलेच अष्ठपैलु व्यक्तीमत्व असलेले व जनतेच्या विश्वासाचा, सेवेच्या समर्पणाचा आणि कर्तव्यपरायणतेच्या सचोटीत वावरणारे कर्तव्यदक्ष मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते.
दि.२६ मे २०२५ रोजी पासुन वाशिम जिल्ह्यातल्या सध्या संवेदनशिल म्हणून ओळखल्या जाणार्या मंगरुळपीरच्या ठाणेदार पदाची धुरा ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्या खांद्यावर घेतली.त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर पोलीस खात्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, कठोर शिस्त आणि तरीही माणुसकीची जाण या गुणांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. पोलीस दलातील अधिकारी म्हणजे केवळ कायदा राबवणारा नसून तो समाजाचा मार्गदर्शक, रक्षक आणि संकटात धावून जाणारा आधारस्तंभ असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून वारंवार सिद्ध केले आहे.पदभार स्वीकारताच केवळ कार्यालयीन कामकाजावर भर न देता, थेट जनतेशी संवाद, स्थानिक समस्या समजून घेणे आणि त्या मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. कोणतीही घटना असो, चोरी, मारामारी, अवैध व्यवसाय, सामाजिक तणाव किंवा अपघात ठाणेदार किशोर शेळके हे घटनास्थळी स्वत: उपस्थित राहून परिस्थिती हाताळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कार्यकाळात मंगरुळपीर परिसरात गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे. कायद्याचा धाक निर्माण करतानाच, सामान्य नागरिकांच्या मनातील पोलीसांविषयीची भीती कमी करून विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आज मंगरुळपीर पोलीस स्टेशन म्हणजे केवळ तक्रार नोंदवण्याचे ठिकाण न राहता, न्याय, संरक्षण आणि मार्गदर्शनाचे केंद्र बनले आहे.आपल्या सेवाकाळात कधीही पदाचा गैरवापर न करता, कर्तव्यालाच सर्वोच्च स्थान दिले.
शिस्त ही त्यांची ओळख आहे. वेळेचे काटेकोर पालन, कर्मचा:यांमध्ये शिस्त निर्माण करणे, प्रत्येक फाईल, प्रत्येक तक्रार गांभीर्याने हाताळणे या बाबी त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र ही शिस्त मानवी संवेदनाशून्य नसून, ती न्याय आणि समतोल राखणारी आहे. त्यामुळेच पोलीस कर्मचारीही त्यांचा आदर करतात आणि नागरिकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात.समाजाने दिलेल्या विश्वासाचे ओझे ते अभिमानाने वाहतात.पोलीस अधिकारी हा जनतेचा सेवक असतो ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.पोलीस दलाचे खरे यश केवळ गुन्हे नोंदवण्यात नसून, गुन्हे घडूच नयेत यासाठी निर्माण केलेल्या नियंत्रणात्मक यंत्रणेत असते. ठाणेदार शेळके यांनी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ही बाब अत्यंत गांभीर्याने ओळखली आणि त्यानुसार गुन्हे नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे मंगरुळपीर तालुका परिसरात कायदा सुव्यवस्थेचे चित्र लक्षणीयरीत्या सुधारले आहे. ठाणेदार यांचा ठाम विश्वास आहे की, गुन्हा झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा होण्याआधीच प्रतिबंध करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात नियमित पेट्रोलिंग, रात्रीचे गस्त दौरे, संशयितांवर नजर ठेवणे आणि माहिती संकलनाची मजबूत व्यवस्था उभी केली. गावागावात पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश गेल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसला.
विशेषत: चोरी, घरफोडी, अवैध दारूविक्री, जुगार, वाळू चोरी यांसारख्या प्रकारांवर त्यांनी कठोर कारवाई केली. कायद्याचा धाक निर्माण करताना त्यांनी कुणालाही पाठीशी न घालता, कायदा सर्वांसाठी समान हे तत्व प्रत्यक्षात आणले. परिसरात काही काळ अवैध दारूविक्री, मटका-जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय डोके वर काढत होते. या सामाजिक अपप्रवृत्तींमुळे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नव्हता, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन ठाणेदार शेळके यांनी विशेष मोहिमा राबवत अशा व्यवसायांवर थेट घाव घातला.
अनेक ठिकाणी अचानक छापे, मुद्देमाल जप्ती, गुन्हे नोंद यामुळे परिसरातील अवैध धंदे करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि बहुतांश प्रमाणात गुन्हेगारीवर आणी अवैध धंद्यावर आळा घातला यामुळे सामान्य नागरिकांनी सुचकेचा नि:श्वास सोडला. गुन्हे नियंत्रण करताना केवळ कठोरपणा पुरेसा नसतो, तर संवेदनशीलता आणि समतोल निर्णयक्षमता तितकीच आवश्यक असते. कौटुंबिक वाद, शेजारी भांडणे, किरकोळ वादविवाद यांसारख्या प्रकरणांमध्ये ठाणेदार यांनी अनेकदा समेटाचा मार्ग अवलंबून वाद शांततेने मिटवले. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा अनावश्यक बोजा कमी झाला आणि सामाजिक सलोखा टिकून राहिला. पोलीस स्टेशनमध्ये येणार्या तक्रारदाराला ऐकून घेणे, त्याची बाजू समजून घेणे आणि कायद्याच्या चौकटीत योग्य निर्णय देणे ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पोलीस स्टेशनकडे भीतीने नव्हे तर विश्वासाने पाहू लागले.कोणत्याही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी ही तणावपूर्ण किंवा दंगलसदृश परिस्थितीत लागते. अशा वेळी घाबरून न जाता, प्रसंगावधान राखत ठाम निर्णय घेणे आवश्यक असते. ठाणेदार शेळके यांनी अशा अनेक प्रसंगांत नेतृत्वगुणांचे उत्कृष्ट दर्शन घडवले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कारणांमुळे निर्माण होणा:या तणावाच्या प्रसंगी त्यांनी वेळीच बैठकांद्वारे संवाद साधून, स्थानिक नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि शांतता समित्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे अनेक संभाव्य संघर्ष वेळेतच टळले. कोणताही अधिकारी एकटा काम करू शकत नाही. त्यामागे सक्षम टीम असणे आवश्यक असते. ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचार्यांमध्ये एकजूट, शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण केली आहे. प्रत्येक कर्मचार्याला त्यांची भूमिका स्पष्टपणे समजावून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि चांगल्या कामासाठी कौतुक करणे यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावी झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे पोलीस कर्मचारीही अधिक आत्मविश्वासाने आणि तत्परतेने काम करताना दिसतात. हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.
ठाणेदार यांची भूमिका नेहमीच कठोर पण न्याय्य राहिली आहे. समाजातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. गुन्हेगारांबाबत कठोर असले तरी, निरपराध नागरिकांबाबत ते सदैव सहानुभूतीशील राहिले आहेत. त्यामुळेच ते आज मंगरुळपीरवासीयांचे विश्वासू रक्षक बनले आहेत.
आजच्या काळात पोलीस यंत्रणेची सर्वात मोठी गरज म्हणजे जनतेशी संवाद आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे. ठाणेदार किशोर शेळके यांनी ही बाब अत्यंत अचूकपणे ओळखली आणि ‘पोलीस म्हणजे केवळ कायदा राबवणारी यंत्रणा नसून समाजाचा अविभाज्य घटक आहे ही संकल्पना मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्षात उतरवली. विश्वासाचा पाया ठाणेदार शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस स्टेशनचे दरवाजे जनतेसाठी अधिक खुले केले. तक्रारदाराशी थेट संवाद, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनेकदा ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती नसते. अशावेळी त्यांनी समजावून सांगण्याची भूमिका घेतली. पोलीस स्टेशनमध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा संशयित नसून, अनेकदा तो न्यायाच्या शोधात आलेला असतो, ही जाणीव ठेवून त्यांनी काम केले. त्यामुळेच आज अनेक नागरिक कोणतीही भीती न बाळगता, थेट पोलीस ठाण्यात येऊन आपली समस्या मांडू लागले आहेत.
समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला घटकांबाबत ठाणेदार किशोर शेळके यांनी नेहमीच विशेष संवेदनशीलता दाखवली आहे. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक छळ, छेडछाड यांसारख्या प्रकरणांत त्यांनी त्वरित दखल घेत कठोर कारवाई केली आहे. त्याचबरोबर महिलांना कायद्याची माहिती मिळावी, स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी मार्गदर्शनही केले. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन, त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अनेकदा ज्येष्ठ व्यक्तींना पोलीस स्टेशनपर्यंत येणे कठीण असते; अशावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. ही माणुसकीची भूमिका आजच्या यांत्रिक काळात विशेष उल्लेखनीय ठरते. भविष्यातील समाज घडवण्यात विद्यार्थी व युवकांचा मोठा वाटा असतो. ही बाब लक्षात घेऊन ठाणेदार शेळके यांनी शाळा, महाविद्यालये आणि युवकांशी संवाद साधण्यावर भर दिला. व्यसनमुक्ती, सायबर गुन्हे, वाहतूक नियम, कायदेशीर जबाबदा:या याबाबत त्यांनी जागरूकता कार्यक्रम राबवले. विशेषत: तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी समज, संवाद आणि समुपदेशनाचा मार्ग स्वीकारला. अशा सर्वोतोपरी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले ठाणेदार किशोर शेळके हे सामान्य माणसांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.8459273206












































