
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे.ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही.असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल,असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.सदावर्ते यांनी मंगळवारी रात्री उशिरा वडीगोद्री येथे अंबड,पैठण आगारातील कर्मचार्यांशी संवाद साधला.त्यांनी एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाविषयी बाजू मांडली.
यावेळी सदावर्ते म्हणाले की,एसटी कर्मचार्यांचे हाल सुरू आहे.आम्ही एकत्र आलो आहोत.सर्व घटकांचा आम्हाला पाठिंबा आहे.काही लोक संप फोडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.काही अमिष दाखविले जात आहेत.परंतु आम्ही कष्टकरी आता बळी पडणार नाही.त्यांच्याकडेच माणूस राहिलेला नाही.त्यांनी वल्गना बंद कराव्यात,असेही सदावर्ते यांनी यावेळी म्हटले.
एसटीचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.त्यामुळे सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.गेल्या काही दिवसांपासून कामगारांच्या सेवा समाप्तीसह निलंबित करण्याचा सपाटा महामंडळाने लावला आहे.त्यानंतरही कर्मचारी ऐकत नसल्याने नुकताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता.त्यावरून सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला.आमच्या एसटी कामगारांना अल्टिमेटम नाही तर सन्मान मिळाला पाहिजे.
तसेच माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आहे.सर्वानी संयम पाळणे आवश्यक आहे.कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये.शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.२० डिसेंबरला आपल्याला चांगली बातमी कळू शकते.राजकीय पक्ष सकाळी एक बोलतात रात्री एक बोलतात,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कामगार नेते गुजर यांनी एसटी कामगारांना मार्गदर्शन केले.यावेळी एसटी कामगार यांनी घोषणाबाजी केली.कामगारांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना सदावर्ते यांनी उत्तरे दिली.यावेळी मोठ्या संख्येने एसटी कामगार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.











































