Home मराठवाडा विकास कामात गटा-तटाचे राजकारण न करता एकसंघपणे काम करा – पालकमंत्री– राजेश...

विकास कामात गटा-तटाचे राजकारण न करता एकसंघपणे काम करा – पालकमंत्री– राजेश टोपे

422

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

– रस्ते हे विकास प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. मतदारसंघात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे जाळे निर्माणावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत असून रस्त्यांची सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जांबसमर्थ-कोठाळा साकळगाव- कंडारी पारडगाव या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी काकडे कंडारी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर सुरज चव्हाण, सुदाम शिंदे,शिवाजी काकडे,सिताराम काकडे, आबासाहेब वरखेड, कल्याण सपाटे, भागवत रक्ताटे, नानाभाऊ उगले, जगन्नाथ काकडे, सुदामराव शिंदे, रहीमभाई, जगन्नाथ शिंदे, तहसिलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी जाधव, बापुराव देशमुख, कार्यकारी अभियंता चव्हाण, भागवत सोळंके, संभाजी देशमुख,रमेश घांडगे, भास्कर गाढवे, अमोल देशमुख, धनंजय देशमुख,सुनिल उगले, पंजाब डख,चंद्रकांत जैस्वाल,
चंद्रभुषण जैस्वाल,राम शिंदे, केशव शिंदे, मुरलीधर शिंदे, नजीरभाई, दिलीप माकोडे, रामेश्वर ढेरे, बाबुराव राठोड, रमेश उगले, नानाभाऊ उगले, सुधाकर भोसले, परमेश्वर जाधव, संजय जाधव, भाऊसाहेब उगले , धनंजय देशमुख, नितीन वरखडे, भगवान इंगळे,सुनिल उगले, ज्ञानेश्वर माऊली आनंदे, दिपक वरखडे, सरपंच चत्रभुज आनंदे, राजकुमार वायदळ, सुरेश साबळे, सिद्दीकी पटेल.आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यासमोर आर्थिक अडचण असली तरी मतदारसंघात विकास कामांसाठी अडचण येऊ न देता अनेकविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. संपुर्ण मतदारसंघात मजबुत व पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून रस्ते विकासासाठी जवळपास शंभर कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे.रांजणी ते राजाटाकळी या ४३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन तीन पदरी सिमेंट रस्त्याचे काम या ठिकाणी करण्यात येणार असून या रस्त्याचा फायदा अनेक गावांना होऊन दळणवळणाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. येणाऱ्या काळात गोदा काठावरील भागात पक्क्या रस्त्यांची उभारणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत या भागात होणारी रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
मतदारसंघात विविध विकास कामाबरोबरच आरोग्य सुविधा अधिक बळकट होऊन नागरिकांना आरोग्याच्या सेवा चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत अंबड व घनसावंगी येथे प्रत्येकी ५०कोटी रुपये खर्चून सर्व सुविधांनीयुक्त शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या व मोफत स्वरूपात मिळाव्यात यासाठी अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येत असल्याचे सांगत आरोग्य सेवा बळकटीकरणांमध्ये सिएसआर फंडातूनही निधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे. अंबड येथील रुग्णालसाठी टाटाट्रस्ट यांनी 8 कोटी रुपयांची अत्याधुनिक अशी उपकरणे दिली असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
विद्युत विकासालाही अधिक प्रमाणात चालना देण्यात येत असून जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी १३२ व ३३ केव्हीची विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना अखंडितपणे वीजेचा पुरवठा व्हावा, यासाठी एसडीटी ट्रान्सफार्मरही संपुर्ण जिल्ह्यात बसविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंचनाची सुविधा अधिक प्रमाणात वाढावी यासाठी जालना तालुक्यातील हातवण प्रकल्पासाठी२९७ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला असुन या प्रकल्पासाठी भु-संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ७१४ हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच २४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
मानवी जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगत आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. ग्रामीण भागातील मुला-मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळून त्यांनीही आपला, गावाचा व जिल्ह्याचा नावलौकिक करावा या बाबीचा विचार करून मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शाळा खोल्यांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगत गावा-गावात प्रार्थना स्थळांच्या उभारणीबरोबरच ज्ञानमंदिरे उभारण्याची आवश्यकता असून यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीबाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी गतवर्षात ४हजार घरकुले मंजुर करुन घेतली असुन चालु वर्षात १० हजार घरकुलांची मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. तसेच या घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी वाळू वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील वाळूघाट राखीव ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक विकासाची कामे करण्याबरोबरच समाजातील निराधार, निराश्रित, अपंग यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध समित्यांवरील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी करण्याचे आवाहन करत जिल्ह्याच्या विकासकामामध्ये गटातटाचे राजकारण न करता विकास अधिक गतीने करण्यासाठी एकसंघपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते घनसावंगी तालुक्यातील विविध ठिकाणी रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले.