
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि.,अंकुशनगरचे युनिट नं.१ चा सांगता समारंभ दिनांक १८ मे रोजी संचालक मनोजकुमार मरकड यांचे शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण पुजेने संपन्न झाला तर युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील सांगता समारंभ दि. २३ मे रोजी उपाध्यक्ष उत्तम पवार यांचे शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण पुजेने संपन्न झाला आहे.
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि.,अंकुशनगरचे सन २०२०-२१ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे शुभहस्ते करण्यात आला.युनिट नं.१ अंकुशनगरकडील प्रत्यक्ष ऊस गाळपास दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी सुरुवात होऊन दिनांक १४ मे २०२१ रोजी हंगाम बंद झाला आहे.
हंगामातील २०५ दिवसामध्ये ८ लाख २२ हजार ०२९ मे.टन ऊस गळीत होऊन ८ लाख ४३ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.सरासरी साखर उतारा १०.२६% मिळाला आहे.तसेच कारखान्याचे युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील प्रत्यक्ष ऊस गळीतास दि. २७ ऑक्टोबर २०२० रोजी सुरुवात होऊन दिनांक १७ मे २०२१ रोजी हंगाम बंद झाला आहे.हंगामातील २०३ दिवसामध्ये ५ लाख २५ हजार ०९५ मे.टन ऊस गळीत होऊन ५ लाख ४० हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.सरासरी साखर उतारा १०.३०% मिळाला आहे.युनिट नं.१ व २ मिळून एकुण १३ लाख ४७ हजार १२४ मे.टन ऊस गळीत झाले असून एकुण १३ लाख ८४ हजार १४० क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे.
डिस्टीलरी प्रकल्प दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी सुरु होऊन ०३ मे २०२१ रोजी बंद झाला.१८८ दिवसामध्ये ५४ लाख ७१ हजार ९३३ बल्क लिटर्स अल्कोहोल व ५५ लाख ११ हजार १५७ बल्क लिटर्स इथेनाॅलचे उत्पादन झाले आहे.कारखान्याचा सहवीज निर्मीती प्रकल्प दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी सुरु झाला असून दिनांक २३ मे २०२१ रोजी बंद झाला आहे.
या हंगामात २०८ दिवसामध्ये ८ कोटी ०७ लाख ८२ हजार युनिट वीज निर्मीती झाली असून २ कोटी ६७ लाख ८५ हजार युनिट वीज कारखान्याने स्वतःसाठी वापरली असून ५ कोटी ३९ लाख ९७ हजार युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केली आहे. सन २०२०-२१ गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या इतिहासात प्रथमच दोन्हीही युनिटकडे उच्चांकी ऊस गळीत झाले आहे.या सर्व यशामध्ये कारखान्याचे मार्गदर्शक आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे,संचालक मंडळ,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,खाते/विभाग प्रमुख,अधिकारी,कर्मचारी,कामगार,ऊस तोड वाहतुक कंत्राटदार व मजुर,इतर कंत्राटदार व हितचिंतक या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
या हंगामात नोंदलेल्या व बिगर नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप झाले आहे.कोरोना महामारीमुळे राज्यात टाळेबंदी सुरु असतांनाही मोठया धैर्याने तोंड देत याचा सामना करीत गाळप हंगाम पार पडला आहे.पुढील गळीत हंगाम २०२१-२२ करीता कारखाना कार्यक्षेत्रात १८ ते २० लाख मे.टन ऊस उपलब्धतेचा अंदाज शेती खात्याने वर्तविला आहे.पुढील हंगामातही अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न असल्याने ऑफ सिझनमध्ये कारखान्याचे दोन्ही युनिटची गाळप क्षमता वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
लवकरच ऑफ सिझनचे कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार असून ऑक्टोबर २०२१ च्या पहिल्या आठवडयात कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होण्याचे दृष्टीने ऑफ सिझन कामाचे नियोजन करण्यात आले आहे.











































