
ईकबाल शेख
वर्धा – कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चचे रात्री 8 वाजता पासुन 30 मार्चचे सकाळी 8 वाजता पर्यंत जिल्हयात संचारबंदी लागू केली आहे.
सदर कालावधित शासनस्तरावर पुर्वनियोजित असलेल्या परीक्षा कोविड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेता येतील. तसेच परीक्षार्थ्यांना वाहतुकीकरीता उपलब्ध सार्वजनिक बससेवा किंवा खाजगी वाहनांना परवाणगी राहील. परंतु सबंधित परिक्षार्थ्यांनी परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रवाशांची वाहतुक करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या संचार बंदी आदेशात नमुद आहे.
गृहविलगीकरणात असलेले व्यक्ती बाहेर फिरतांना आढळून आल्यास आता होणार 2 हजार रुपयाचा दंड
कोरोना बाधित असलेले पण कोरोना लक्षणे नसलेल्या कोरोना संसर्ग बाधितांना गृह विलगीकरणात असणे बंधनकारक आहे. परंतु काही गृहविलगीकरणातील कोरोना बाधित व्यक्ती बाहेर फिरतांना दिसून येत आहे. अशा व्यक्ती यापुढे बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांचेकडून 2 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात येईल व संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.
जिल्हयात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना लक्षणे नसलेल्या परंतु कोरोना बाधित गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये . गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीं बाहेर पडल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 नुसार शिक्षेसपात्र राहिल, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढलेल्या आदेशात नमुद आहे.










































