Home मराठवाडा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल

97

अब्दुल कय्युम

औरंगाबाद,दि. 18 –करोना व्हायरसचा कोव्हीड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्यादृष्टीने उच्च न्यायालय, मुंबई यांनी पारित केलेल्या परिपत्रकाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांनी न्यायिक जिल्ह्याचे आस्थापनेवरील न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये दि.17 मार्च, 2020 पासून बदल केले असून त्याप्रमाणे न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 तर कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 यावेळेत होणार असल्याचे प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.

सर्व न्यायिक अधिकाऱ्यांची जामीन अर्ज, अटकपुर्व जामीन अर्ज, मनाई हुकुमाचे तातडीचे अर्ज, रिमांड व फौजदारी प्रक्रिया संहिता क्रमांक 164 अंतर्गत जबाब, स्थगिती आदेशासाठीचे अर्ज आदी तातडीचे कामकाज उपरोल्लीखीत कार्यालयीन वेळेत करावे. सर्व संबंधीत न्यायिक अधिकाऱ्यांनी न्यायालयात गर्दी टाळण्याच्या हेतूने संबंधीत न्यायीक अधिकारी हे त्यांच्याकडील कर्मचारी वर्गाच्या 50 टक्के उपस्थितीबाबत त्यांच्याकडील संबंधीत अधीक्षक/सहाय्यक अधीक्षक यांना योग्य त्या सुचना देतील व 50 टक्के कर्मचारी अदला-बदलीने उपस्थित राहतील, असे पहावे याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

विधिज्ञ संघाने बार रुममध्ये गर्दी होणार नाही व सदर बार रुम्स कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर उघड्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर उघडे राहणार नाही, असे निर्देशित करण्यात आल्याचे प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.