
ऑपरेशन सिंदूर मध्ये होता सहभाग ,
अमिन शाह
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील रहिवासी संतोष मोरे यांनी सैन्यदलात मोठे शौर्य गाजविल्याबद्दल त्यांना शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शौर्य पदक बहाल करून सन्मानित केले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदुर राबविण्यात आले. त्यामध्ये हवालदार मोरे यांनी रात्रभर तोफगोळ्यांचा मारा करीत मिशन यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. दुश्मनांच्या तोफगोळ्याचा स्प्लिंटरचा तुकडा उडून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तरीही त्यांनी मोठ्या साहसाने पाकिस्तानी सैन्याच्या दिशेने तोफगोळे मारले. या शौर्याबद्दल स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी शौर्य पदक जाहीर झाले होते. ते आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याहस्ते हवालदार मोरे यांचा पदकाने गौरव करण्यात आला. मोरे हे जम्मू-काश्मिरमधील कुपवाडा (तंगधार) भागात ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालीयनमध्ये कार्यरत आहेत. सैन्यदलात १२ वर्षांपासून ते देशरक्षणासाठी सेवा देत आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. तेव्हापासून देशवासीयांच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली होती. अखेर सैन्यदलाने ऑपरेशन सिंदुर राबवून पहलगाव हल्ल्याचा बदला घेतला. ९ मे २०२५ च्या रात्री दीड वाजता पाकीस्तान आणि पीओकेच्या दिशेने ‘वॉर’ सुरू करण्यात आला. अडीचशे ते तीनशे भारतीय जवानांनी युद्ध छेडले. पाकिस्तानच्या सैन्यानेदेखील तोफगोळे फेकणे सुरू केले. तोफगोळ्याच्या स्प्लिंटरच्या तुकडा हवालदार मोरे यांच्या उजव्या हाताला लागला. यात ते जखमी झाले. मात्र, काही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निर्धार करीत पहाटे पाच वाजेपर्यंत संतोष मोरे यांनी शत्रूच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा सुरुच ठेवला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. शारीरिक कमजोरी आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या शौर्याबद्दल संतोष मोरे यांना १५ ऑगस्ट २०२५ ला सैन्यदलाने शौर्य पदक जाहीर केले. २८ मार्च २०२६ रोजी एका समारंभात हे पदक बहाल करण्यात आले. यावेळी मोरे यांच्या पत्नी सुजाता मोरे ह्या सुद्धा उपस्थित होत्या.
लग्नाच्या अकराव्या दिवशीच कर्तव्यावर
बुलढाणा जिल्ह्याचे शूरवीर सुपुत्र हवालदार संतोष मोरे हे आपल्या लग्नाकरिता रजेवर आले होते. लग्नाला जेमतेम अकरा दिवस होत नाही तोच ऑपरेशन सिंदुरसाठी रवाना होण्याचा संदेश धडकला. भारतीय लष्कराच्या आदेशानुसार हजर होऊन मिशनमध्ये त्यांनी आपला पराक्रम दाखवून दिला.













































