
कार्यालय प्रतिनिधी
यवतमाळ: शहरातील पांढरकवडा रोडवर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या शेकडो झाडांची निर्दयताने कत्तल केली जात आहे. भर उन्हाळ्यात, जेव्हा सावलीची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच ही झाडांची कत्तल सुरू असून हे दृश्य पाहून नागरिकांचे मन सुन्न झाले आहे.

या अगोदरही धामणगाव रोड, दारव्हा रोड या भागांतील झाडे याच कारणास्तव तोडण्यात आली होती. मात्र, या झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्याचे किंवा ती वाढविण्याचे कुठलेही ठोस नियोजन शासनाकडून दिसून येत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पर्यावरणप्रेमींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “रस्ता रुंद करणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर निसर्गाचाही विचार झाला पाहिजे. जुनी झाडे तोडल्यावर नवीन झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही जबाबदारी प्रशासनाने घ्यायला हवी,” असे मत मांडले आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे झाडांची कत्तल होत राहिली तर भविष्यात शहराचा तापमानवाढीवर आणि प्रदूषणावर मोठा परिणाम होऊ शकतो.
नागरिकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने पर्यावरणपूरक निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली आहे.












































