
▪️शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेसच्या जितेंद्र मोघेंच्या पुढाकार
आर्णी/ तालुका प्रतिनिधी :
गतवर्षात अतिवृष्टी ने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती पिकांचे सरसगट सर्व्हेक्षण करून शासनाने तात्काळ मदत द्यावी. आर्णी तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांना घेऊन काँग्रेस कडून आक्रमक पवित्रा घेतला. आज आर्णी तहसिल कार्यालयाला काँग्रेस कडून रात्रभर जागरण करून जागल आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरूवात सायंकाळीं ०६.०० वाजता होणारं आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या”जागल आंदोलन” या अभिनव आंदोलनाची तालुक्यात चांगलीच चर्चा आहे.
नुकत्याच केळापूर आणि घाटंजी तालुक्यामध्ये या मुद्द्याला घेऊन काँग्रेस युवा नेते जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात भव्य भाकर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रास्त मागण्या आणि काँग्रेस पक्षाचा असलेला मोठा जनाधार यामुळे हे दोन्हीं ही मोर्चे यशस्वी ठरले. तर प्रशासनाकडून याची दखल घेत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. आता पुढील टप्प्यात काँग्रेस कडून आर्णी तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दिनांक २९ डिसेंबरला तहसिल कार्यालयावर जागल मोर्चाचे आयोजन करून शासनाकडे काही प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्या आहे.
शेतकरी शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी जागल करतो तो त्याचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.आज मितीला अस्मानी संकटा बरोबर शासनाच्या कमकुवत,उदासीन सुलतानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर संकटाचा घाला सुरूच आहे त्यातुन सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज असताना शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे जगाच्या पोशिंद्याच्या हक्कासाठी विविध मागण्या घेवुन राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आर्णीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात आर्णी तहसिल कार्यालयावर दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० ते ३० डिसेंबर २०२३ सकाळीं ०७.०० वाजेपर्यंत तहसिल कार्यालयाला जागून “जागल आंदोलन” चालु करण्यात आले आहे.
आर्णी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषीत करण्यात येवुन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी, खरीप व रब्बी पिकांना पिक विमा जाहिर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत रक्कम अदा करण्यात यावे,कापसाचे आयात धोरण बंद करुन कापसाचे दर वाढविण्यात यावे, विज नियमीत करुन विज पुरवठा दिवसा ८ तास देण्यात यावा. विज पुरवठा ट्रान्सफॉर्मर (डि.पी) जळाल्यास २४ तासाच्या आत बसविण्यात यावे, या प्रमुख व अन्य मागण्याना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. जिंतेंद्र मोघे आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी तहसिल कार्यालयाला रात्र भर कडाक्याच्या थंडीत जागून ह्या ज्वलंत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचां प्रयत्न करीत आहेत . या सर्व मागण्यांचे निवेदन सुध्दा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












































