Home महाराष्ट्र ज्ञानव्यापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील – हिंदु जनजागृती...

ज्ञानव्यापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील – हिंदु जनजागृती समिती

137

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात नुकतेच वक्तव्य केले आहे. आम्ही मा. मोहनजींचा आदर करतो; परंतु ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. प्राचीनकाळापासून काशी ही मोक्षनगरी आहे, असे हिंदु धर्मशास्त्रांत वर्णिले आहे. हिंदु जीवनदर्शन तिच्याशिवाय अपुरे आहे. त्यामुळे या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून आता हिंदू मंदिरांना मुक्त करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ज्ञानव्यापीमधील अविमुक्तेश्वराला मुक्त करणे, हे प्रथम कर्तव्य आहे, अशी हिंदु समाजाची धारणा आहे. हीच हिंदु जनजागृती समितीचीही भूमिका आहे. हिंदु समाजाने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा लढाही संयमाने लढून विजय मिळवला आहे. ‘ज्ञानव्यापी’च्या संदर्भातही न्यायालयीन मार्गाने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे जोपर्यंत ज्ञानव्यापी अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, *असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.*

*श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,* अनेक विषयांवर संघटना किंवा नेते यांची मते वेगळी असू शकतात. विविध मतांचा आदर करणे, हीच तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे मतभिन्नता म्हणजे वादविवाद आहेत, असे नाही. त्यामुळे याबद्दल 100 कोटी हिंदू समाजाचेच नाही, तर काही कार्यकर्त्यांचेही मत भिन्न असू शकते. ज्ञानव्यापी मशिदीच्या संदर्भातील सर्व वस्तुस्थिती न्यायालयासमोर आहे. ज्याद्वारे ते हिंदू मंदिर आहे, हे सिद्ध होईल, अशी हिंदु समाजाची श्रद्धा आहे. केवळ प्राचीन काळातच नाही, तर आजही बामियानची बुद्धमूर्ती असो किंवा तुर्कस्तानचे ‘हागिया सोफिया चर्च’ असो, मुसलमानांची आक्रमक मानसिकता सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत माणुसकीच्या आणि बंधुतेच्या दृष्टीकोनातून मुसलमान त्यांच्याकडे असलेली हिंदू मंदिराची जागा हिंदूंच्या ताब्यात देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंना आंदोलनाद्वारे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ही लढाई लढावीच लागणार आहे. याची तयारी हिंदु समाजाने आरंभलेली आहे.