मजहर शेख,
नांदेड/किनवट,दि:०८:- कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत व्यस्त असतांनासुद्धा सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी रखरखत्या उन्हात कधी फटफटीवर तर कधी पायपीट करत तालुक्यातील अतिदूर्गम भागात जाऊन सिंचन विहिरी, मनरेगाची कामे व आरोग्य केंद्रांना भेटी देऊन केवळ कोरोनाच नव्हे तर आवश्यक असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची तंबी सबंधितांना दिली.
मंगळवारी ( दि.04 ) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार,भाप्रसे यांनी सकाळी दररोजच्या प्रमाणे तालुका प्रशासनाच्या कोरोना टीमची बैठक आटोपली. भर दुपारी रखरखत्या उन्हात प्रधानसांगवी शेतशिवार गाठले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाणीटंचाई दुर करणाऱ्या सार्वजनिक सिंचन विहीर बांधकामाची पाहणी केली. या कामावर मजुर उपस्थित नव्हते. त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता दिसणारी अर्धवट कामे लवकर पुर्ण करुन घ्यावी, पुढच्या भेटीत अपूर्ण दिसता कामा नये, यापुढे मी खपवुन घेणारं नाही, अशी तंबीच त्यांनी संबंधितांना दिली. तेथील आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कर्मचारी उपस्थितीपट पाहिला व कोरोना विषयक करीत असलेल्या कामाचा आढावा घेतला.
त्यानंतर श्री पुजार निघाले आंदबोरी (चि) ग्रामपंचायतीतील अतिदुर्गम शेत शिवारात. तिथे चारचाकी वाहन जात नसल्याने गाडीरस्त्याच्या चाकोली वाटेने फटफटीवर तर त्यानंतर हाती छत्री घेऊन पायी चालत बिरसा मुंडा कृषी क्रांती स्वावलंबन योजनेतील सिंचन विहीरी बांधकामाची पाहणी केली. चिखली (खु) गट ग्राम पंचायतीतील टिगणवाडी शिवारातील अशाच सिंचन विहीरीची पाहणी केली. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांचे सोबत गटविकास अधिकारी सुभाष धनवे, विस्तार अधिकारी (कृषी) संजय घुमटकर, तांत्रीक सहाय्यक (मनरेगा) गंगाधर मदने व सहाय्यक लक्ष्मीकांत ओबरे उपस्थित होते.
प्रशासन केवळ कोरोना प्रतिबंधाच्या उपाय योजनेतच मग्न नसून पाणी टंचाईला दुर करणाऱ्या अत्यावश्यक असणाऱ्या सिंचन विहिरीची व शेतीची कामेही कटाक्षाने पूर्ण करून घेत आहे, हेच श्री पुजार यांनी दाखवून दिले आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता दिलेल्या आकस्मिक भेटीने उपविभागातील किनवट व माहूर तालुक्यातील अशा अत्यावश्यक विकास कामांनी गती घेतली आहे.