Home राष्ट्रीय महाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर

महाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर

558

नवी दिल्ली, दि. ८ : भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये बुद्धिनिष्ठतेचा उदय झाला. बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या या बुद्धिमान लोकांच्या परंपरेने महाराष्ट्राला बौद्धिकतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आज मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २१वे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर श्री.कुबेर बोलत होते.

भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडून आधुनिक व विज्ञानवादी विचारांची कास धरण्याचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्रातील बुद्धिनिष्ठ विचारकांनी राज्याला व देशालाही महत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे श्री.कुबेर म्हणाले.

राजा राममोहन रॉय यांचा धर्मसुधारणेचा प्रयत्न हा भारतातील सुधारणेचा पहिला अध्याय मानला जातो. पुढे या सुधारणांचा मोठा प्रवाह महाराष्ट्रात सुरु झाला व आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे प्रणेते ठरले. १२ भाषांचा त्यांचा अभ्यास होता व विविध विषयांमध्ये त्यांना गती होती. पारतंत्र्यातील भारत देशाला जांभेकरांनी बौद्धिकतेचा आधार दिला. इंग्रज भारतीयांची कशी लुट करीत आहेत हे सांगणारे जांभेकर पहिले द्रष्टे होते. त्यांनी ‘रिव्हर्स ड्रेन’ हा सैद्धांतिक विचार मांडला आणि येथून महाराष्ट्राच्या बौद्धिक परंपरेला सुरुवात झाली, असे श्री.कुबेर म्हणाले.

१८१६ ते १८४७ या कालावधीत पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग यांनी वेग-वेगळ्या पातळीवर समाज सुधारणेचे काम केले त्यांच्याच काळात प्रार्थना समाजाची निर्मिती झाली व पुढे या माध्यमातून महाराष्ट्रात बौद्धिकतेचे मोठे कार्य उभे राहिले. भाऊ दाजी लाड यांनी ही पंरंपरा पुढे नेली या बुद्धिवादी मंडळींनी मुंबईत प्रबोधनाचे बीज रोवले पुढे त्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे श्री.कुबेर यांनी सांगितले.

याच कालखंडात गोपाळहरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी ‘प्रभाकर’ वर्तमानपत्रातून तेजस्वी लिखाण करून सतत विज्ञान व आधुनिकतेची कास धरण्याचा विचार मांडला. पुढे १८२७ ते १८४० या कालखंडात महात्मा फुले हा दैदिप्यमान तारा उदयाला आला. ज्या वातावरणातून फुले आले तेथूनच सुसंगत ज्ञान मिळवून त्यांनी व्यवस्थेला आव्हान देण्याची बौद्धिकता दाखवली.

१८५७ हे वर्ष महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाचे ठरले याच वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठातून तेजपुंज तारे उदयाला आले यात पंडित विष्णू परशुराम शास्त्री, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नारायण महादेव परमानंद, महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, गणेश वासुदेव जोशी, नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडे केशव कर्वे यांचा समावेश आहे. या सर्व बुद्धिमान लोकांनी भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आधुनिक व विज्ञानवादी विचारांचा आग्रह धरून त्यांनी राज्यात सुधारणांचे पर्व राबविले.

महाराष्ट्र हे बुद्धिगम्यतेला महत्त्व देणारे राज्य आहे अशी मांडणी करून श्री.कुबेर म्हणाले, ‘नितीमत्तेसाठी धर्माची गरज नाही व धर्म ही अनावश्यक गोष्ट आहे’ असा आधुनिक विचार गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडला व त्याचा परिपोष पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये झिरपला. ‘माझ्या देहावर माझा अधिकार’ ही भूमिका मांडत इंग्लडच्या राणीला या संदर्भात पत्र लिहीणाऱ्या मुंबई येथील रक्माबाईमुळे भारतात मुलींच्या विवाहाचा कायदा बदलला गेला व संमतीवयाचे प्रकरण म्हणून इतिहासात याची नोंद झाली.

आगरकरांचे सहकारी गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना घडविले हा महाराष्ट्राच्या तर्कवादाचा महत्वाचा टप्पा असल्याचे श्री.कुबेर म्हणाले. महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील तर्कवादाच्या परंपरेतील शेवटचे नेते होते व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणात ‘महादेव रानडे यांच्या प्रमाणे बुद्धिमान महाराष्ट्रात निपजला नाही व निपजणार नाही’ असे गौरवोद्गार काढले होते, असे श्री.कुबेर यांनी सांगितले.

धर्माची चिकित्सा करणारे प्रबोधनकार ठाकरे, स्वदेशीची संकल्पना देशात सर्वप्रथम मांडणारे लोकमान्य टिळक, विमान उडवण्याचा प्रयत्न करणारे तळपदे, इंग्लडमधील वर्तमानपत्रांनी भारताचा एडिसन असा गौरव केलेले शंकर आबाजी भिसे, विंचवाच्या विषावर संशोधन करणारे बावीस्कर, देशातील विज्ञानाच्या प्रगतीतील केंद्र बिंदू ठरलेली टाटा मूलभूत संशोधन संस्था व तिची उभारणी, धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी देशात पहिल्यांदा उभारलेली सहकाराही गुढी आणि विमा या संकल्पनेचा प्रसार करणारे अण्णा साहेब चिरमुले या व्यक्तीमत्वांच्या कार्यावरही श्री.कुबेर यांनी यावेळी प्रकाश टाकला.

महाराष्ट्राच्या या बुद्धिमान परंपरेचा अभ्यास व्हावा आणि ही परंपरा पुढच्या पिढीकडे देण्याचे प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षाही श्री.कुबेर यांनी व्यक्त केली.