
प्रशांत बारादे – राऊतखेडकर
नांदेड :- कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची धुरा प्रशासक , ग्रामसेवकाच्या खांद्यावर देण्यात आली असून ग्रामसेवक तर अगोदरच नाहीत पण प्रशासकही अद्याप गावात आले नसल्याने प्रशासक काळात संबंध गावे वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
नांदेडसह तालुक्यांतील बऱ्याच ग्रामपंचायतींचा कार्यकाळ साधारणतः ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात संपला आला आहे .कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सध्या तरी शक्य नसल्याने शासनाने कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली आहे .गावातील निर्माण होणार्या समस्या ,ग्रामपंचायतकडून देण्यात येणाऱ्या सुविधा रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवकच्या जोडीला सरपंचाची भूमिका म्हणून प्रशासकाची नियुक्ती केली आहे .परंतु देण्यात आलेले प्रशासक अजूनही गावात आले नसल्याने ग्रामीण भागातील समस्या सोडवायचे कुणी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
प्रशासक नेमून दिलेल्या गावात पाणी ,वीज शिक्षण ,राशन ,आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याची ओरड आहे . नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरून डासांचा संचार सर्वत्र वाढला आहे .त्यामुळे कोरोनाचा भितीबरोबरच इतर साथीचे रोग होण्याची भीती वाटत आहे . जर गावातील एखाद्या नागरिकांनी ग्रामसेवकाला संपर्क केला ते जिल्ह्यावर , तालुक्यावर असल्याचे सांगतात तर गावातील नागरिकांना प्रशासक नेमका कोण ? हे ही माहीत नसल्याने सगळा गोंधळ उडाला आहे ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे चालू आहे .











































