
नांदेड, दि. ३१ ( राजेश एन भांगे ) – आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिक कर्जाचा लाभ देण्यासाठी बँकानी गावोगाव पिक कर्ज जनजागृती करावी. शेतकऱ्यां कडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे प्रमाण 19 टक्के एवढे कमी आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी बँकानी गावोगाव पीक कर्ज मेळावे आयोजित करुन या कर्ज मेळाव्याची माहिती, पुर्व सूचना, प्रसिध्दी व्यापक प्रमाणात करावी. याबाबत स्थानिक लोक प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात यावे. बँकानी जुने कर्ज धारकांना नवीन पीक कर्ज वाटप करतांना फेरफार नक्कल, टोच नकाशा, बेबाकी प्रमाणपत्र व इतर अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असेही निर्देश जिल्हादंडाधिकारी डाॕ.विपिन इटनकर यांनी दिले आहेत.











































