लक्ष्मण बिलोरे
जालना मराठवाडा – मुंबईहून दोन दिवसांपूर्वी जालन्यात पोहचलेल्या दोन भावांसह एकाच्या पत्नीचा अशा तीन जणांचे अहवाल काल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून आता जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख ४४ वर चढला असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जालना तालुक्यातील वडगाव वखारी येथील मूळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे तीन जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. सदर तिघेही आता वखारी वडगाव येथे गेलेले नाहीत.मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालना येथे परतल्यानंतर हे तिघेही सिद्धेश्वर पिंपळगाव ता.अंबड येथे गेले असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. तेथे गेल्यानंतर तिघांनाही खोकला आणि ताप आल्याने हे तिघेही अंबड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते. अंबड येथून या तिघांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून जालना जिल्ह्याची रुग्ण संख्या आता ४४ वर पोहचली असल्याने जिल्हा वासियांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे.