Home विदर्भ तीन क्षेत्र वगळता उर्वरीत भाग प्रतिबंध मुक्त करा – पालकमंत्री संजय राठोड...

तीन क्षेत्र वगळता उर्वरीत भाग प्रतिबंध मुक्त करा – पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे शिवसेनेची मागणी…!

120

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – शहरातील इंदीरा नगर, पवार पुरा तसेच डोर्लीपुरा हा भाग वगळता उर्वरीत भाग प्रतिबंध मुक्त करण्याची मागणी शिवसेनेने यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे केली आहे. प्रतिबंधीत करण्यात आलेल्या तीन भागाव्यतिरीक्त इतर भागात एकही रुग्ण कोरोना बाधीत आढळून न आल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

यवतमाळ शहरातील 81 पॉसिटीव्ह रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे आता यवतमाळ शहरात कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण सापडण्याची गती मंदावली आहे. यवतमाळ शहरातील सध्याच्या स्थितीत प्रभाग क्रमांक 10, 20 चा पूर्ण भाग तसेच प्रभाग क्रमांक 8, 9, 18, 19 चा काही भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. ह्या परिसरातील काही भाग हा 8 मार्च पासून तर उर्वरित भाग हा दिनांक 28 मार्च पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. गत 10 ते 12 दिवसात सदर प्रतिबंधित क्षेत्रातून फक्त 4 ते 5 नवीन रुग्ण पॉसिटीव्ह मिळाले आहेत आणि सुदैवाने हे सर्व रुग्ण हे प्रशासनाने आधीच विलगिकरण कक्षात दाखल केले होते. विलगिकरण केलेल्या रुग्णांना सोडून प्रतिबंधित क्षेत्रात नवीन कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही. विशेष म्हणजे यवतमाळ शहरात सापडलेल्या रुग्णांचा अभ्यास केल्यास हे सर्व नवीन रुग्ण पवारपूरा, इंदीरा नगर व डोर्लीपुरा भागातील असल्याचे स्पष्ट होते. हे तिन्ही भाग हे प्रतिबंधित क्षेत्रात येतात. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ह्या तीन भागा सोबतच लगतचा सर्व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केलेला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे तेव्हा आवश्यक होतेच, पण आज उपरोक्त दर्शविलेले तीन परिसर सोडून इतर भागात रुग्ण नाहीत हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पवारपूरा, इंदीरा नगर व डोर्लीपुरा हे तीनच भाग प्रशासनाने प्रतिबंधित ठेवावे व इतर परिसर हा उर्वरित यवतमाळ शहाराप्रमाणे शासनाचे निर्देशानुसार मुक्त करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंन्द्र गायकवाड, विभाग प्रमुख मनोज पसारी यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन केली आहे. सदर प्रश्नी योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

जिवनावश्यक वस्तु गरजेच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांना सुध्दा जीवनावश्यक वस्तु मिळने गरजेचे आहे. प्रामुख्याने तीन प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरीत ठिकाणी यवतमाळ शहाराप्रमाणे जीवनावश्यक तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्री करण्यास परवानगी मिळणे आवश्यक आहे. हा निर्णय झाल्यास प्रशासन तसेच नागरिकांवरील ताण कमी होईल. याशिवाय सामाजिक संस्था व प्रशासनाला इंदीरा नगर, डोर्लीपुरा व पवारपुरा ह्या प्रतिबंधित क्षेत्रात जास्त लक्ष केंद्रित करता येईल. यामुळे आपण पालकमंत्री महोदयांकडे तीन क्षेत्र वगळता उर्वरीत भाग प्रतिबंधीत क्षेत्र मुक्त करण्याची मागणी केली आहे.