बदनापूर/ सय्यद नजाकत
लॉकडाऊन काळाल जालनात अडकून पडलेल्या मजूरांवर शुक्रवारी पहाटे काळाने घाला घातला. जालनातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला असलेले २१ मजूर मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी रात्री रेल्वेरुळावरून औरंगाबादकडे निघाले होते. काही किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर थकेलेले हे मजूर पहाटे औरंगाबाद-जालना मार्गावरील रेल्वेरुळावर विश्रांती घेत असतानाच औंरगाबादकडे येणाऱ्या रिकाम्या मालगाडीखाली मजूर चिरडले गेले. या अपघातात १६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
साथीदार गमावलेला मजुर म्हणाला – पैसे मिळत नव्हते, पास बनत नव्हता, त्यामुळे चालत निघालो
या मजुरांसोबत प्रवास करणाऱ्या वीरेंद्र सिंहने ‘ सांगितले की, “कंत्राटदार आम्हाला पैसे देण्याच्या स्थितीत नव्हते. 7 मे रोजी पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले. परंतु 7 तारखेला आम्हाला पगार मिळाला नाही. मध्यप्रदेशात आमच्या कुटूंबाला आमची गरज होती. घरचे लोक परेशान होते. यामुळे आम्ही एक आठवड्यापासून पास बनवण्याचा प्रयत्न करत होतो. दोन-तीन वेळा प्रयत्न केले पण मदत मिळाली नाही.”
“कोणताही मार्ग शिल्लक नसल्याने आम्ही रेल्वे रुळाच्या मार्गाने प्रवास करण्याचे ठरवले. अगोदर औरंगाबादला पोहोचू आणि तेथून पुढचा मार्ग निश्चित करू. आम्ही जालन्याहून गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता निघालो. अनेक किलोमीटर प्रवास केला. रात्री उशीरा थकल्यावर आमचे साथीदार काही अंतरावर रुळांवर बसू लागलो. मी अनेक सहकाऱ्यांना रूळापासून दूर रहाण्यास सांगितले. पण पुढे गेलेले साथीदार रुळावरच बसले आणि त्यांचा डोळा लागला. आम्ही रूळापासून दूर होतो त्यामुळे वाचलो. आम्हाला मालगाडी येताना दिसली. मालगाडी ड्रायव्हरने हॉर्न देखील वाजवला, पण गाडी वेगात होती. आम्ही साथीदारांना आवाज दिली पण ते ऐकू शकले नाही. आम्ही पळत जवळ गेलो तोपर्यंत मालगाडी निघून गेली होती.”
आणखी एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला – आम्ही बॅग टाकून झोपलो होतो, ट्रेन आली आणि बॅग…
रुग्णालयात दाखल झालेल्या दुसर्या मजुराने सांगितले की, “आमचा डोळा लागला होता. आम्ही इतके थकलो होतो की, आम्हाला मालगाडीचा आवाज ऐकू आला नाही. आम्ही रूळापासून थोडे दूर होतो. आम्ही पाठीवर बॅक टाकली आणि तसंच झोपलो. जेव्हा मालगाडी गेली तेव्हा तिने बॅग खेचत नेली. जीव वाचला पण जखमी झालो. जे बॅग घेऊन ट्रॅकच्या मध्यभागी झोपले होते, ते वाचले नाहीत.”