
बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या.
गटविकास अजित बांगर यांचा कडक कारवाईचा इशारा
जुबेर शाह
सिंदखेडराजा : अक्षयतृतीयेचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो, म्हणून या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची दाट शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढविली असून ग्रामीण व शहरी भागात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन पं.स. गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी केले आहे. तसेच तालुक्यात असा प्रकार घडल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
भारतीय कायद्यानुसार मुलांचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुठेही असा प्रकार आढळल्यास यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान बालविवाह हा गुन्हा ठरत असला तरी अक्षय तृतीयेला आजही अनेक ठिकाणी बालविवाहाचे प्रकार घडत असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभाग व राज्यातील संबंधित यंत्रणांना बालविवाह रोखण्यासाठी सतत ताकीद दिली आहे. यानुसार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सूचनेनुसार सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी तालुक्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.












































