
अमीन शाह
बुलडाणा
चिखली ९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चिखली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा प्रकोप झाला. भोरसाभोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. अल्पावधीत झालेल्या या पावसामुळे घरांना पाणी शिरले, शेतमाल वाहून गेला, तर काही ठिकाणी जनावरांचेही नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडाल्याने ‘ओला दुष्काळ’ परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, तसेच घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले. गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विजेच्या तारा यांनाही फटका बसला आहे.
या गंभीर परिस्थितीत शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल जाधव व शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील यांनी तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “सरकारने तत्काळ पावले उचलून बळीराजाला मानसिक आणि आर्थिक बळ द्यावे, अन्यथा संतापाची लाट उसळेल,” असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक प्रशासनाने पावसामुळे बाधित भागांची पाहणी सुरू केली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्याच्या तयारीत आहे. तथापि, नागरिक आणि शेतकरी वर्गाला मदत मिळण्यास विलंब झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












































