
➡️ घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांचा पुढाकार

अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाटंजी तालुक्यातील आमडी येथे सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पंचायत समितीचे माजी सदस्य अभिषेक ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे हे होते. याप्रसंगी जमलेल्या हजारो लोकांच्या जन समुदायासमोर बोलतांना सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराजांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार केला तरच आपली भावी पिढी सुसंस्कृत निघेल, असे प्रतिपादन केले. डाँ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा हेच आमचे खरे दैवत असून घराघरात त्यांची उपासना करणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. या वेळी मंचकावर घाटंजी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश उर्फ बल्लू पाटील लोणकर, यवतमाळ जिल्हा भु – विकास बँकेचे माजी अध्यक्ष शंकरराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस जितेंद्र शिवाजीराव मोघे, डॉ. अरविंद भुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पंचायत समितीचे माजी सदस्य अभिषेक ठाकरे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, पांढरकवडा येथील विभागिय अध्यक्ष तथा पार्डी (नस्करी) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आशिष सुरेशबाबू लोणकर, घाटंजी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अजय यल्टीवार, मुर्लीचे माजी सरपंच यादवराव निकम, घाटंजी येथील अडते अकबर तंवर, घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष डॉ. विजय कडू, संजय गोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी घाटंजी तालुक्यातील महादीप परीक्षेत यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद शाळा तिवसाळा, सायतखर्डा, जरंग, झटाळा या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सैनिकी शाळा परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या जिल्हा परिषद शाळा शरद येथील विद्यार्थिनी व व राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम आलेल्या खुशी डवरे हिचा सुद्धा या वेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करतांना, लोकनेते स्व. सुरेशबाबु लोणकर यांच्या विचारांचा वारसा जपत शेतकऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे सामाजिक दायित्व असून त्यांना मदत करता आल्याने समाधान व्यक्त केले. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे यांनीही आपले समयोचित भाषण केले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांची आज नितांत आवश्यकता असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन येरंडगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक राजेश उदार यांनी केले. तर आभार आकाश ठाकरे (आमडी) यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांच्या मित्र परिवारने अथक परिश्रम घेतले. सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाला घाटंजी तालुक्यातील हजारों स्त्री, पुरुष, युवक व राजकीय मंडळी आदीं आवर्जून उपस्थित होते.












































