
मनिष गुडधे – अमरावती ( 8999776984 )
कोणतंही सार्वजनिक ठिकाण हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जितकी सरकारची असते तितकीच ती नागरिकांची देखील असते. एखादं उद्यान, बस किंवा रेल्वे स्वच्छ नसली, की बहुतांश लोक आधी त्या जागेचा फोटो काढतात, तिथे भेट देऊन आपल्याला किती किळसवाणं वाटलं हे लिहितात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. बस्स. इतकाच आपला आणि त्या जागेचा संबंध असतो.नागरिक म्हणून ही जागा स्वच्छ असावी यासाठी प्रशासनाला एखादा सल्ला देणं, आखून दिलेले नियम स्वतः पाळणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला हटकणं हे आपण कधीच पुढाकर घेऊन करत नाहीत. परदेशात हे होतं, म्हणून ते देश स्वच्छ असतात.भारत सरकारला लोकांच्या रेल्वे स्थानकावर कुठेही थुंकण्याच्या सवयीमुळे स्वच्छतेवर एका वर्षात १२०० कोटी रुपये खर्च करावे लागतात हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. सर्व रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेची शिस्त लावण्यासाठी ४२ रेल्वे स्थानकांची निवड करून ती जागा स्वच्छ ठेवण्यासाठी रेल्वेने एक उपाययोजना केली आहे. काय आहे हे ‘रेल्वे स्वच्छता मिशन ?’ जाणून घेऊयात.प्रवाशांच्या आरोग्याची काळजी म्हणून भारतीय रेल्वे आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर ‘वेंडिंग मशीन’ बसवणार आहे. या वेंडिंग मशीन मध्ये ५ रुपये आणि १० रुपये किमतीचे ‘पाऊच’ असणार आहेत ज्याचा पुरवठा भारत सरकार स्वतः करेल.तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींना केवळ ते पाऊच त्या वेंडिंग मशीन मधून घ्यायचे आहेत आणि त्यांचा थुंकतांना वापर करायचा आहे. तुम्ही प्रवास करत असलेल्या रेल्वे स्थानकावर ही वेंडिंग मशीन कुठे आहे? याची चौकशी आपण स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्यांकडे करू शकतो.पश्चिम, उत्तर आणि केंद्रीय रेल्वेने या स्वच्छता मोहिमेचं कंत्राट नागपूरच्या ‘ईझीस्पिट’ या स्टार्टअप कंपनीला देण्यात आलं आहे. नागपूरच्या या कंपनीने वेंडिंग मशीन बसवण्याचं काम सुरू केलं आहे.नागपूर महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी ‘ईझीपोस्ट’ सोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी प्रथम फेरीत येणारे पहिले ४२ रेल्वे स्थानक हे या दोन महानगरपालिकांच्या अखत्यारीत येतात असं सांगण्यात आलं आहेरेल्वे कडून देण्यात येणाऱ्या या पाऊचचा असा फायदा आहे, की ते मुडपल्यानंतर सहज खिशात बसू शकतं आणि त्याची जाडी इतकी ठेवण्यात आली आहे की, त्यामुळे तुमच्या कपड्यांवर कोणतेही डाग पडणार नाहीत, त्याचा कोणताही वास येणार नाही.याचा फायदा असा होणार आहे की, ज्यांना आजारामुळे थुंकणं आवश्यक असेल, त्यांना या सुविधेचा फायदा होऊ शकतो.पाऊचचं पुढे काय करायचं?पर्यावरणप्रेमी लोकांना हा प्रश्न पडणं साहाजिकच आहे. हे पाऊच ‘बायोडिग्रेडबल’ म्हणजेच जिवाणूंच्या मदतीने कुजवता येण्यासारखं आहे. या पाऊच मध्ये द्रव्य स्वरूपातील वस्तूचं घन स्वरूपात रूपांतर करण्याची क्षमता असणार आहे.१५-२० वेळेस वापरता येण्याजोगं हे पाऊच पूर्ण वापर झाल्यानंतर जमिनीवर जरी टाकलं तरी ते पाऊच जमिनीत कुजून जातं आणि त्यापासून कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही.कोरोना काळात आरोग्य विभागाने इतक्या सूचना करून देखील लोकांची थुंकण्याची सवय नियंत्रणात आली नाही हे मोठं आश्चर्य आहे. भारत सरकारच्या या पुढाकाराने जर येणाऱ्या काळात बदल झाला आणि रेल्वे स्थानक स्वच्छ दिसायला लागले तर याचा फायदा आपल्या सर्वांनाच होईल हे नक्की.










































