
व-हाड निघालंय यवत्याला
भांब राजा मध्ये सन्नाटा
माऊलीच्या पालखीवर विरजण

देवानंद जाधव
यवतमाळ – अवघ्या जगात लाखो लोकांच्या नरडीचा घोट घेणारा कोरोणा, आजही मानवी रक्तांसाठी आसुसलेला दिसत आहे. तालुक्यातील राजाच्या भांब मध्ये कोरोणाने पाय पसरले आहे. गोजिरवान्या गावच्या ऊरावर कोरोणा थयथय नाचतो आहे. दोन चार बेडुक गिळलेल्या,विषारी डोम्या नागासारखा, कोरोणा बाधीतांचा आकडा सातत्याने फुगत चालला आहे.

आपल्या गावाचं कसं व्हईल त् व्होवो बाप्पा. असे सुतकी विचार घराघरांतुन बाळ॔त होत आहे. भाव ऊतरलेल्या कांद्यासारखे चेहरे करुन, अवघ्या गावातील जनता, भिती,काळजी, आणि विचाराच्या विस्तीर्ण अशा वादळात गटांगळ्या खात आहेत. माञ अशाही निराशेच्या वातावरणात जिल्हाधीकारी एम.देवेंदर सिंह आणि तहसीलदार कुणाल झाल्टे अगदी पोटतिडकीने भांब राजा वासीयांची काळजी घेत आहेत. स्वतःच्या घरादारांवर तुळसीपञ ठेऊन, आरोग्य विभाग देखील सेवा देत आहे. धुराळा ऊडवत, आणि सायरन वाजवत,गावात घुसणारी रुग्णवाहिका ग्रामस्थांच्या काळजाची धडधड वाढवत आहे. चार दोन डझन कोरोणा बाधीतांना आतापर्यंत वलगीकरण कक्षात हलविले आहे. गावच्या राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे सुध्दा, विरोधाचे गाठोडे गावाच्या वेशीवर टांगुन, तमाम भांब राजा वासीयांच्या, आरोग्य आणि सुख संपदेसाठी ग्रामदैवत मलकोजी माऊलीच्या चरणी साकडे घालत आहेत. गावात एक राष्ट्रीयकृत बॅंक आणि एक सहकारी बॅंक आहे. त्यामुळे येथे दररोज परिसरातील शेकडो लोकांचा राबता असतो. हिवरी, वाटखेड, मनपुर, माळमसोला, मंगरूळ, बोरी गोसावी, रामनगर, वसंतनगर, साकुर, बेलोरा, तरोडा, वाई, रुई बेचखेडा यासह अन्य गावातील नागरिक येथे कामासाठी येत असतात, शिवाय भांब राजा येथील पाच पन्नास मजुर लगतच्या देशी दारू आणि साखर कारखान्यात कामाला येत असतात. सर्वसामान्य जनतेने कोरोणा विषयक दिशानिर्देश बासनात गुंडाळून ठेवल्याने, आता ग्रामीण भागात देखील, कोरोणाने तोंड मारणे सुरु केले आहे. याचे ताजे उदाहरण भांब राजा मध्ये दिसून आले आहे.
सरकारी स्वस्त धान्य दुकान अर्थात *क॔ट्रोल* हे ख-या अर्थाने गावच्या भाकरीचा डेपो असतो. साहजिकच तेथुन गावभर अन्न धान्याचे वितरण होत असते. नेमके अशाच एका बेसावध क्षणी कोरोणा काळाने त्या व्यवस्थापकाला कवेत घेतले. आणि तेथुनच ही श्रृंखला प्रारंभ झाली. यामुळे परिसरातील संपुर्ण गावे प्रभावित झाली आहेत. शिवाय मलकोजी माऊली ज्ञानयज्ञ आणि पालखी सोहळा अगदी ऊंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्या सोहळ्याला मुर्दाड कोरोणाची दृष्ट लागण्याचे प्रशासनाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकंदरीतच माऊलीच्या पालखीवर विरजण पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावात सर्वञ सन्नाटा पसरला आहे. कोरोणा बाधीतांचा आकडा फुगत असल्याने, *व-हाड निघालंय यवत्याला* असी परिस्थिती भांब राजा मध्ये निर्माण झाली आहे.
दुभंगली धरणी माता..फाटले आकाश गं..असे म्हणणे सध्या तरी संयुक्तिक वाटते. तेव्हा वड्याचे तेल वांग्यावर ओतणा-या शासनाच्या भरवस्यावर न राहता,
घरीच राहा, सुरक्षित राहा,
मास्क (मुसके)वापरा,
काळजी घ्या स्वतःची आणि शेजा-याची सुध्दा.
जय मलकोजी माऊली










































