लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी
जालना – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे.या काळात गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदीचे प्रशासनाचे आदेश असल्याने साहजिकच लग्न सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यावर बंदी आहे.त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात, लग्न तिथी जाहीर करूनही लॉकडाउनमुळे थाटात लग्न लावता येईनात , हौशी वर-वधू कडील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.तर अनेकांनी सामंजस्याने , लाॅकडाउनच्या काळातही सोशल डिस्टंन्सचा नियम पाळत काढलेल्या लग्न तिथीवर लग्न उरकून घेतले जात आहे.जालना तालुक्यातील सावंगी तलान येथे गुरूवारी,१४ मे २०२० रोजी ठरलेल्या मुहूर्तावर मास्कचा वापर करून व सोशल डिस्टंन्सचे नियम पाळत, अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मोजक्याच ४० ते ५० लोकांच्या उपस्थितीत, संत सेवालाल महाराज मंदिरामध्ये लग्न उरकून घेतले.
हा आदर्श विवाह उपसरपंच श्रीचंद बाला राठोड यांची नात व दिलीप श्रीचंद राठोड यांची मुलगी अमृता आणि दुसरीकडं,बिबी येथील.. देविदास चव्हाण यांचा मुलगा विवेक यांच्यात विवाह अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. हा लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करण्याची संपूर्ण तयारी झालेली होती.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे वधु-वरांकडील मंडळीनी आपसात समन्वय साधून शासनाच्या नियमांचे पालन करत हे लग्न पार पडले.
मा.आ.कैलासशेठ गोरंट्याल व विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार राजेशभैया राठोड यांनी या नवदांपत्याला फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.